रत्नागिरी-सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे सध्या तेथे रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या निळ्या प्रकाशमान लाटांमुळे चर्चेत आले आहेत. या लाटांवर निळ्या रंगाचा फ्लॅश पडावा अशा प्रकारची प्रकाशरचना दिसून येत असल्याने पर्यटकांमध्ये, नागरिकांमध्ये त्याविषयीची कमालीची उत्सुकता आहे. हिवाळ्याच्या दिवसांत दिसणाऱ्या या निळ्या प्रकाशसोहळ्यामागे वैज्ञानिक कारण आहे. नॉक्टिल्युका नावाच्या एकपेशीय सूक्ष्म प्राण्यांमुळे हा अद्भुत वाटणारा प्रकाशोत्सव दिसू लागला आहे. तो नयनरम्य, मनोहारी असला तरी त्यामागे दडलेला धोकाही लक्षात घेतला पाहिजे.
निसर्ग हा अद्भुत गोष्टींची खाण आहे. निसर्गातील असंख्य रहस्यांचा वेध विज्ञानाच्या साहाय्याने घेतला जातो. अशाच एका रहस्याची चर्चा सध्या राज्यात विशेषतः कोकणात आहे. रत्नागिरीमधील आरे वारे, वरवडे आणि सिंधुदुर्गमधील काही समुद्रकिनाऱ्यांवर सध्या रात्रीच्या वेळी निळ्याशार प्रकाशमान, चमचमणाऱ्या लाटा पाहायला मिळत आहेत. गतवर्षीही अशा प्रकारच्या निळ्या लाटा आणि त्याबरोबरचा निळा प्रकाश काही प्रमाणात दिसून आला होता. यामुळे साहजिकच आश्चर्य व्यक्त होत आहे. सागरी लाटांचा हा नीलसोहळा पाहण्यासाठी अनेक पर्यटक या किनाऱ्यांना भेटी देत आहेत. या चमकणाऱ्या लाटा हा कसलाही चमत्कार नसून त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते समजून घेणे गरजेचे आहे. तसेच हा निळा प्रकाश हिवाळ्याच्या काळातच का दिसतो?
गेल्या महिन्यापासून रत्नागिरी आणि अरबी समुद्राच्या इतर किनाऱ्यांवर दिसणाऱ्या लाटांच्या चमचमाटाला जैविक प्रकाश म्हणजेच बायो-ल्युमिनिसेन्स असे म्हणतात. हा चमकणारा निळा प्रकाश नॉक्टिल्युका सिंटीलान्स या सूक्ष्म प्राण्यांमुळे दिसत आहे. हा प्राणी एकपेशीय आहे. याला “सी-स्पार्कल’ असेही म्हटले जाते. हा सूक्ष्म प्राणी डायनोफ्लॅजिलेट या गटातील असून ते पाण्यावर तरंगतात. हा प्राणी थव्याने किंवा मोठ्या समूहाने राहतो. त्याच्या मोठमोठ्या वसाहती असतात. याबाबत फारसा अभ्यास झालेला नाही. हल्ली हे सूक्ष्म प्राणी अरबी समुद्रात मोठ्या संख्येने दिसून येऊ लागले आहेत. हिवाळ्यात त्यांचे मोठमोठे थवे आढळतात. या थव्यांना किंवा वसाहतींना “विंटर ब्लूमस्’ असे म्हणतात.
नॉक्टिल्युका हे प्राणी समुद्रातील डायआयटम्स आणि इतर डायनोफ्लॅजिलेट खातात. तसेच समुद्राच्या पाण्यात असणाऱ्या जीवाणूंवर तसेच माशांच्या व इतर जलचरांच्या सूक्ष्म अंड्यांवर हे प्राणी जगतात. ज्या ठिकाणी खाद्य जास्त आहे तिथे यांचे प्रमाण अधिक दिसून येते. गंमत म्हणजे, हे प्राणी एरव्ही लाल रंगाचे असतात. पण हिवाळ्यामध्ये हे प्राणी पेडिनोमोनाज नामक एकपेशीय हिरव्या सूक्ष्म शेवाळांचे भक्षणही करतात आणि त्यांना आपल्या शरीरात आश्रयही देतात. त्यामुळे हिवाळ्यात हे प्राणी हिरव्या रंगाचे दिसतात आणि अन्य ऋतूत ते लाल रंगाचे दिसतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात जर आपण या भागातील समुद्राचे पाणी पाहिले तर त्यावर हिरवट थर किंवा तवंग आलेला दिसू लागला आहे. पेडिनोमोनाज हे शेवाळ सूर्यप्रकाशाच्या मदतीने प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतः अन्न तयार करते. या शेवाळाने तयार केलेले अन्नही नॉक्टिल्युका खात असतात. म्हणजेच हे नॉक्टिल्युका प्राणी शेवाळाने तयार केलेले अन्नही खातात आणि त्यांना शरीरात आश्रयही देतात; त्यामुळेच या प्रक्रियेला “सिम्बायोसिस’ किंवा “म्युटालिजम’ असे म्हटले जाते. कारण दोघांनाही एकमेकांपासून फायदे आहेत.
नॉक्टिल्युका हे प्राणी आपल्या शरीरातून काजव्यांप्रमाणे जैविक प्रकाश तयार करतात. या प्राण्याच्या शरीरामध्ये ल्युसीफेरील नावाचे प्रोटिन किंवा प्रथिन असते आणि ल्युसीफेरेज नावाचे विकर म्हणजेच एन्झाइम असते. त्यांच्यातील जैवरासायनिक प्रक्रियेमुळे जैविक प्रकाश तयार होतो. अर्थात, ही प्रक्रिया झाली म्हणून लगेच प्रकाश तयार होत नाही. त्यासाठी या प्राणी पेशी उद्दीपित होणे आवश्यक असते. खळखळणाऱ्या आणि उसळणाऱ्या लाटांमुळे त्या उद्दीपित होतात. त्यातूनच आपल्याला लाटा येताना निळा चमचमणारा प्रकाश दिसतो. हा प्रकाश किनाऱ्यालगतच जास्त प्रमाणात दिसतो. समुद्राच्या मध्यभागी दिसत नाही. याचे कारण किनाऱ्याकडे या प्राण्यांना लागणाऱ्या खाद्याची उपलब्धता जास्त असते. तसेच वातावरणही काहीसे अनुकूल असते. त्यामुळे या प्राण्यांचे थवेच्या थवे अन्नासाठी किनाऱ्याकडे येतात. त्यामुळे हे किनारे निळ्या प्रकाशाने उजळून जातात.
गेल्या दोन वर्षांपासून आपल्याकडे हा निळा प्रकाशोत्सव दिसून येऊ लागला आहे. कदाचित त्याआधीच्या काळातही हे सूक्ष्म प्राणी असावेत; पण त्यांची संख्या कमी असल्याने त्यांचा जैविक प्रकाश तितक्या मोठ्या प्रमाणावर दिसून आला नाही. तथापि, याचे पहिले अस्तित्व जुलै 2015 मध्ये केरळमध्ये दिसून आले होते. केरळमधील सागरी विज्ञान संशोधन संस्था यावर अभ्यास करत आहे. महाराष्ट्रातील सागरी विज्ञान संशोधन संस्थांनीही आता याबाबतचे संशोधन हळूहळू सुरू केलेले आहे.
समुद्राच्या उदरात असंख्य छोटे-मोठे जलचर-जीव असतात. त्या प्रत्येकाला स्वतःच्या बचावासाठी, संरक्षणासाठी काही ना काही वरदान निसर्गाकडून लाभलेले असते. नॉक्टिल्युकांनाही असेच एक वरदान लाभले आहे. हे प्राणी आपल्या शरीरातील रासायनिक प्रक्रियेदरम्यान अमोनिया तयार करतात. त्यामुळे इतर जलचर त्यांचे भक्षण करत नाहीत. नॉक्टिल्युकांना खाणारा केवळ एकमेव सागरी प्राणी आहे, तो म्हणजे जेलिफिश. परिणामी, अलीकडील काळात किनाऱ्यावर येणारे जेलिफिशही निळ्या रंगाचे दिसू लागले आहेत. याचे कारण नॉक्टिल्युका हे त्यांच्या शरीरात जात आहेत. आपल्याकडील काही पर्यटक हे चमकणारे जेलिफिश गोळा करताना दिसताहेत. परंतु जेलिफिशना स्पर्श केल्याने शरीरावर प्रचंड खाज सुटते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील जेलिफिश पकडण्याचा मोह टाळणेच उत्तम!
अरबी समुद्रात नॉक्टिल्युकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्यामागचे कारण समुद्राच्या पाण्याचे वाढते प्रदूषण. या प्रदूषणामुळे समुद्राच्या पाण्यातील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढत असून ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. याखेरीज जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचे तापमानही वाढत चालले आहे. याचा जलचरांच्या पुनरुत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळेच आज मासेमारी करताना पूर्वीसारखे मासे मिळत नाहीत. समुद्राच्या पाण्याचे हे वाढते प्रदूषण, वाढते तापमान अन्य जलचरांसाठी घातक ठरणारे असले तरी नॉक्टिल्युकांसाठी ते अनुकूल ठरत आहे. त्यामुळेच यांची संख्या वाढत चालली आहे. हा प्राणी प्रामुख्याने डायआयटम्स म्हणजेच तरंगणाऱ्या सूक्ष्मजीवांचे ग्रहण करत असतो. त्यामुळे या प्राण्यांची संख्या जसजशी वाढत चालली आहे तसतसे समुद्रातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण घटायला लागले आहे.
हे डायआयटम्स सागरी जीवनातील प्राथमिक उत्पादक (प्रायमरी प्रोड्युसर्स) आहेत. समुद्रातील जैवसाखळीमध्ये प्राथमिक स्तरावर प्रामुख्याने डायआयटम्सच आहेत. त्यांचीच संख्या घटू लागल्याने सागरी जैवसाखळीच संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणजे इतर सागरी सजीवांपुढे अस्तित्वाचे संकट निर्माण होऊ शकते. म्हणजेच हे एक प्रकारचे नैसर्गिक जैविक युद्धच आहे, असे म्हणावे लागेल. हा धोका तात्काळ दिसून आला नाही तरी नॉक्टिल्युकांचे प्रमाण जर अमर्याद वाढत गेले तर भविष्यात जलचरांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्यास नवल वाटायला नको.
मानवाच्या बेजबाबदारणामुळे आणि विकासाच्या हव्यासामुळे निसर्गसाखळी बरोबरच सागरी जैवसाखळीही संकटात सापडत चालल्याने आपण आता जागे होण्याची गरज आहे. आज समुद्राच्या पाण्यात अफाट प्रमाणात प्लॅस्टिक टाकले जात आहे. याचा प्रत्यक्ष फटका जलचरांना बसत आहे. तशातच आता हे नवे संकट समोर आले आहे. जागतिक तापमानवाढ आणि सागरी प्रदूषण रोखले तरच या प्राण्यांची वाढ कमी होईल आणि त्यांच्यापासून भविष्यात निर्माण होणारे संकट टळण्यास काही अंशी मदत होईल.
सारांश, आज समुद्राच्या लाटांमधून चमकणारा हा निळा प्रकाश कितीही मनोहारी दिसत असला तरी त्यामागे दडलेला धोका लक्षात घेतला पाहिजे. तसेच नॉक्टिल्युकासारख्या सागराच्या उदरात दडलेल्या असंख्य आश्चर्यकारक गोष्टींचा शोध घेण्यासाठीचा अभ्यासही अखंडितपणे सुरू राहिला पाहिजे. अर्थात, पृथ्वीवर एक भाग जमीन आणि तीन भाग पाणी आहे. आपल्याला इतक्या वर्षांनंतरही एक भाग जमिनीवरील सजीवांचा अभ्यास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यातील असंख्य गोष्टी, रहस्ये अद्याप उलगडायची आहेत. त्यामुळे जलसृष्टीबाबत तर अजून बराच प्रदीर्घ पल्ला गाठणे बाकी आहे. विदेशातील काही संशोधकांनी बनवलेल्या काही चित्रफितींमध्ये असे दिसून आले आहे की, समुद्राच्या ज्या भागातील पाण्यात सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही, जिथे ऑक्सिजनही नाहीये अशा ठिकाणीही सजीवांच्या प्रजाती आहेत. समुद्रामध्येही ज्वालामुखी असून त्यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाजवळ फिरणारे जलचरही अस्तित्वात आहेत. अशा अचंबित करणाऱ्या गोष्टी पाहिल्या की निसर्गापुढे पुनःपुन्हा नतमस्तक व्हायला होते!
– प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर,
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ