पुणे – करोनावरील लस घेतली तरी कपड्यांप्रमाणे “मास्क’ हे जीवनावश्यक घटक राहणारच असून, ते आयुष्यातून जाऊ शकत नाहीत, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमधील वस्त्र या गरजेत आता “मास्क’चा समावेश करणे अनिवार्य झाले आहे.
करोनाची लस घेतली याचा अर्थ करोना व्हायरस गेला किंवा आपल्याला याची लागण होणार नाही असा होत नाही. करोनापासून जी लागण होईल, त्याची तीव्रता कमी होईल, हा त्यामागचा अर्थ आहे. त्यामुळे हा व्हायरस शरीरात प्रवेश करू नये यासाठी ज्या उपाययोजना सांगितल्या आहेत त्या अंगीकारायच्या आहेतच.
“केवळ करोनाच नाही, तर रोज उत्पन्न करणारे अनेक व्हायरस, बॅक्टेरिया हे हवेच्या, स्पर्शाच्या किंवा अन्य माध्यमातून आपल्या संपर्कात, शरीरात प्रवेश करत असतात. त्यातील काही करोनापेक्षाही जास्त घातक असतात. त्या सगळ्यांपासून मास्क तसेच हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींमुळे बचाव होतो, ही वस्तुस्थिती आहे,’ असे ससून सर्वोपचार रुग्णालयातील फुफ्फुस विकार तज्ज्ञ आणि प्रोफेसर डॉ. संजय गायकवाड यांनी सांगितले. करोना रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने लसीकरण होणार आहे. त्यामुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते होईपर्यंत धोका नाही, असे म्हणता येणार नाही. परंतु मुळातच करोना एवढा एकच विषय नव्हे तर सीझनल फ्लू, स्वाइन फ्लू, क्षयरोग आणि अन्य श्वास, थुंकीसंदर्भातील रोग अस्तित्त्वात आहेतच. त्यामुळे त्यापासून बचावासाठी “मास्क’च वापरावा लागणार आहे,’ असे मत उरो तज्ज्ञ डॉ. अपर्णा बिराजदार यांनी व्यक्त
केले आहे.
स्वाइन फ्लू ते फुफ्फुसासंदर्भातील काही रोग, अस्थमा, क्षय रुग्णांना आम्ही पूर्वीपासून मास्क वापरण्याच्या सूचना करतोच. त्यांना इतर गोष्टींपासून धोका होऊ नये किंवा त्यांच्याकडून इतरांना या रोगाची लागण होऊ नये हा त्यामागचा अर्थ आहे. उपाययोजनांबाबत एवढ्यावरच थांबणे खरेतर उपयोगाचे नाहीच रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कफाचे उत्सर्जन करणे याबाबतही आणखी जनजागृती आवश्यकच आहे. जोपर्यंत या गोष्टी राहतील, तोपर्यंत मास्क हा तोंडावर राहणारच.
– डॉ. अपर्णा बिराजदार, उरो तज्ज्ञ