पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ससून रुग्णालयातील उंदीर प्रकरणाने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. मात्र, नातेवाइकांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही, तसेच झालेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून एक चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असून, त्याचा अहवाल आल्यावर प्रकरणाचा खुलास होईल.
सागर दिलीप रेणुसे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. संबंधित तरुणाला दि. १६ मार्चला रात्री उशिरा ससून रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. 1 एप्रिल रोजी उंदराने चावा घेतल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाइकांनी ससून रुग्णालयाकडे केली, तसेच मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे यांनी सांगितले, की हा रुग्ण दारु पिऊन पडल्यामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी अवस्थेत होते. २९ तारखेपासून तो व्हेंटिलेटरवर होता. १ तारखेला आमच्याकडे सकाळीच तक्रार आली की या रुग्णाला उंदराने चावा घेतला आहे.
मात्र, उंदीर चावणे आणि त्याच्या मृत्यू हे दोन्ही गोष्टी जोडणे योग्य नाही. ससूनमध्ये खरंच असा काही प्रकार घडला आहे का, याची चौकशी करण्यासाठी समिती तयार करण्यात येणार आहे. त्यात चौकशीअंती सर्व गोष्टी स्पष्ट होतील.