पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिका हद्दीत समाविष्ट ३४ गावांचे नागरीकरण झाले असले तरी या गावांमध्ये पाणी वितरणाचे जाळे नाही. त्यामुळे पाण्यासाठी टॅंकरचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यातच उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. पालिकेचे टॅंकर कमी पडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वाढल्या आहेत.
ही बाब लक्षात घेता ३४ गावांना तातडीनं टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी मास्टर प्लॉन तयार करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशानुसार पाणी पुरवठा विभागाकडून या गावांतील सोसायट्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली. या सर्वेक्षणानंतर कोणत्या भागात किती टॅंंकर वाढवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.
दररोज ११०० टॅंकर…
महापालिकेकडून सध्या ११ गावांमध्ये दररोज ३०० तर २३ गावांमध्ये टॅंकरच्या ८०० फेऱ्या होत आहेत. पाण्याच्या मागणीसाठी सूस, म्हाळुंगे, पिसोळी, होळकरवाडी, फुरसुंगी, उरुळी, मांजरी बु. या गावांमध्ये पाण्याच्या अधिक तक्रारी आहेत. या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी पाणी कमी पडत आहे.
महापालिकेकडून या सर्वच गावांमधील पाण्याची नेमकी स्थिती तसेच किती पाणी आवश्यक आहे, याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मोठ्या सोसायट्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणानंतर गावांना नेमके किती पाणी आवश्यक आहे तसेच महापालिका किती पाणी देऊ शकते, याचा तुलनात्मक अभ्यास करून टॅंकरची संख्या वाढविली जाणार आहे.