– अरुण गोखले
प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालायची याचा पहिला परिपाठ हा जनाबाईने नामदेवास दिला. त्याचं काय झालं, दामाजीपंत आणि गोणाई यांना ईश्वरभक्त, ईश्वरनिष्ठ असा पुत्र हवा होता. तो त्यांना नामदेवाच्या रूपाने दिलाही. पण नामदेवाची विठ्ठल भक्ती त्याच्या लौकिक जीवनाच्या आड येऊ लागली. आपल्या कौटुंबिक कर्तव्याकडेही नामदेव डोळेझाक करू लागले. ते आपल्या कामधंद्यात, घरात हवं तसं लक्ष घालेनात.
एके दिवशी वडील रागावले. आई रागावली. बायकोही बोलली तेव्हा नामदेव एकटाच अंगणात जाऊन बसला. तेव्हा जनाबाई त्याच्याजवळ आली. तिने नामदेवास समजावीत म्हटले, ‘‘नामदेवा! अरे आई बाबा सांगतात त्यात काय चूक आहे. आपण आपला काम धंदा करायला नको का? अरे बाबा कामाची आणि नामाची सांगड कशी घालायची हेच तर लोकांना आपण सांगायला शिकवायला हवंय. पण ते सांगा शिकवायच्या आधी आपण स्वत: तसं वागायला नको का?
नामा! अरे ‘बोले तैसा चाले! त्याची जन वंदिती पाऊले’ हे कसा विसरतोस तू. अरे तू तुझ्या शिंपी व्यवसायाकडे एकदा नीट डोळे उघडून बघ तर खरं. मग तुझे तुलाच कळेल की त्यात किती पारमार्थिक जवळीक आहे ती. दुसरं असं की आता माझंच बघ ना मी केरवारे, दळण-कांडण, धुणी भांडी सगळं करते. पण ते करताना माझे हात काम करत असतात.
तोंडानी विठ्ठलाचे नामस्मरण चालू असते आणि मनात त्याच्या सावळ्या रूपाचे ध्यान. नामा, अरे माझ्यासारख्या अडाण्या जीवाला हे जमतंय, तू तर शहाणा आहेस, होय ना? मग करून तर बघ. जरा त्यात नीट लक्ष घाल आणि मग बघ तुझा व्यवसाय हा किती परमार्थाच्या जवळ जाणारा आहे ते.’’
जनाबाईचे ते शब्द नामदेवाच्या मनात घर करून गेले. त्यांनी खरोखरच त्या आपल्या व्यवसायाकडे त्या दृष्टीने पाहिले अणि मग काय, नामदेवांनाही कामात राम सापडला. इतकंच नाही तर पुढे आपल्या स्वानुभवातून त्यांनीच त्या आपल्या शिवण्याच्या व्यवसायाचीच पारमार्थिक ओळख सर्वांना करून दिली.