राहाता – ऊसतोडणी मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी शासनाने तयार केलेली नियमावली अतिशय किचकट आणि प्रशासकीय स्तरावर वेळकाढुपणाची ठरणार असल्याने हे परिपत्रक मागे घ्यावे. व ऊसतोडणी मजुरांची आहे, त्याच ठिकाणी वैद्यकीय तपासणी करुन एस. टी. महामंडळाच्या बसमधुन त्यांना गावी सुरक्षित पोहचविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
आ. विखे पाटील म्हणाले, ऊस तोडणी मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्याबाबत सरकारने तयार केलेली नियमावली अतिशय किचकट आणि विलंबांची ठरणार असल्यामुळे ऊस तोडणी मजुरांना त्यांच्या गावी पोहचण्यास मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने काढलेल्या पत्रकाचा हवाला देवून आ. विखे पाटील म्हणाले, ऊस तोडणी मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यापासुन ते या मजुरांना पोहचविण्यासाठी वाहतूक परवाने मिळविण्याबाबतची किचकट प्रक्रिया पाहाता ऊस तोडणी मजुर त्यांच्या गावी पोहचणार कधी असा सवाल आ.विखे पाटील यांनी उपस्थित केला.
गेल्या अनेक महिन्यांपासुन ऊसतोडणी कामगार आपल्या गावापासुन आणि कुटुंबापासुन दुर राहत आहेत. तसेच त्यांची शेती पावसावर अवलंबुन असल्यामुळे खरीप हंगाम जवळ आला असल्याने शेतातील पुर्व मशागतीची कामे करण्यासाठी यासर्व ऊसतोडणी मजुरांना त्यांच्या गावी जाणे अत्यंत गरजेचे आहे. मागील गळीत हंगाम संपल्यानंतरही करोनाच्या आपत्तीमुळे ऊसतोडणी मजुर आहे. त्याच ठिकाणी अडकुन पडले आहेत.
प्रशासकीय बाबींमुळे त्यांना गावी पोहचणे शक्य होणार नसेल तर शासन निर्णय होवून उपयोग काय? यासाठी ऊस तोडणी कामगारांची आहे. त्याच ठिकाणी वैद्यकीय तपासणी करुन एस.टी महामंडळाच्या बसमधुन त्यांच्या गावी सुरक्षित पोहचविण्याची व्यवस्था करण्याबाबत सरकारने विचार करावा. सरकारच्या आदेशाप्रमाणे मजुर वाहतूक करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबतच्या सुचना केल्या असुन याची अंमलबजावणी एस. टी. बस मधुनच होवू शकते याकडे आ.विखे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
परिवहन विभागाची राज्यातील सर्व वाहतूक सध्या बंद असल्यामुळे एस. टी. बसचा उपयोग ऊसतोडणी मजुरांना पोहचविण्यासाठी योग्य होईल. संबधित तालुक्यांच्या स्थानिक प्रशासनावर यासर्व ऊसतोडणी मजुरांचा तपासणी अहवाल तयार करण्याची जबाबदारी द्यावी असेही आ. विखे पाटील यांनी सुचित करताना ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतरण शासकीय यंत्रणेतुनच सुरक्षित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.