नवी दिल्ली: देशात करोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. अशा बिकट काळात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे धोक्याचे आहे, असे कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच यूजीसीने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीमुळे गोंधळ वाढतच असून युजीसीनेही विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
राहुल गांधी म्हणाले, करोनाने संपूर्ण देशाला फटका बसल असून अनेकांचं नुकसान झाले आहे. अशात विद्यार्थ्यांचेही नुकसान झालंय कारण परीक्षा रद्द झाल्या आहेत. मात्र सध्या अशा वातावरणात परीक्षा घेणे योग्य नाही. यूजीसीने विद्यार्थ्यांच्या मतांवर विचार करायला हवा.
लॉकडाउनमुळे कॉलेज, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयआयटीसह अनेक परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अन्य देशांमध्येही परिक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यूजीसीने कोणताही गोंधळ न करता वर्षभरात ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या निकालानुसार विद्यार्थ्यांना पास करावे, अशी मागणी करत यूजीसीने दिलेल्या सूचना आणि घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे.
दरम्यान, लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करणे हाच पर्याय योग्य आहे अशी भूमिका राज्यचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. यामुळे एकंदरीत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांमधील परिक्षेसंदर्भातील संभ्रम वाढला आहे.