मुंबई – शेतकरी कायद्याविरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भूमिका दुटप्पी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच 2010 साली तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीच या कायद्याची शिफारस केली असल्याचा दावा त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा कायदा पास करणार महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. जे कायदे केंद्रात आता मंजूर झाले आहेत ते कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात करण्यात आले होते. केंद्राने आता हे कायदे केल्यानंतर त्याला महाराष्ट्रात विरोध करत असल्याने मला आश्चर्य वाटत आहे. महाराष्ट्रात एक भूमिका आणि केंद्राच्या कायद्याबाबत वेगळी भूमिका हा आघाडीच्या नेत्यांचा दुटप्पीपणा असल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या शेतकरी कायद्याच्या संदर्भात 2019च्या कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक तरतुदी दिसून येत आहेत. पवार केंद्रात मंत्री असताना त्यावेळी टास्क फोर्स तयार करून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बाजारपेठेत हा कायदा लागू करावा, अशी विनंती केली होती.
तत्कालीन पवार यांचे पत्र नीट वाचल्यास याची आघाडीच्या नेत्यांना अनुभूती येईल. देशातील नागरिक सुज्ञ आहेत. त्यामुळे ते या कायद्याचे समर्थन करतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.