अहमदाबाद – भारत बंद म्हणजे शेतकऱ्यांच्या नावाखाली होणारे राजकीय आंदोलन आहे. तशा आंदोलनाला गुजरातचे शेतकरी पाठिंबा देणार नाहीत, असे त्या राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सोमवारी म्हटले.
गुजरातमध्ये बंद यशस्वी करण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. त्याचा संदर्भ घेऊन रूपानी यांनी विरोधकांवर आणि विशेषत: कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांचे नाव पुढे केले जात आहे. विरोधक स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांना पुढे करून त्यांनी भारत बंद पुकारला आहे.
गुजरातमधील शेतकरी बिल्कूल असमाधानी नाहीत. त्यामुळे राज्यातील बंदला त्यांचा पाठिंबा मिळणार नाही. समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा कॉंग्रेसने गमावला आहे. शेतीशी निगडीत मुद्द्यांवर सतत भूमिका बदल असल्याने कॉंग्रेसबरोबर शेतकरीही नाहीत, असे ते येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
बंदच्या नावाखाली गुजरातमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. बंदच्या काळात अवैध कृत्ये करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही रूपानी यांनी दिला.