आळंदी – राज्यात राजकीय अशांतता असतानाही गेल्या दोन महिन्यात आळंदीत सर्वधर्मीय सण उत्सव सर्वांच्या सहकार्याने शांततेत साजरे झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. येथे सर्व धर्मीय नागरिक एकत्र येऊन सण साजरे करतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आळंदीतील नागरिकांची ही भूमिका राज्यभर पसरावी, असे मत आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी व्यक्त केले. परिसरातील सण उत्सव शांततेत पार पडल्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी पोलीस स्टेशन येथे गुरुवारी (दि. ५) सामाजिक सलोखा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सर्व धर्मिय संघटनांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, शांतता कमिटीचे सदस्य, आजी माजी नगरसेवक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त, परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्वधर्मीय पदाधिकाऱ्यांनी जयंती सण उत्सव शांततेत झाल्याबाबत आपले मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. सर्व संघटनांचा सत्कार करण्यात आला.
मशिद आणि मंदिरावरही भोंगा नाही-
गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. मात्र तीर्थक्षेत्र आळंदी या वादापासून अलिप्त आहे. येथे पूर्वीपासूनच मशिद किंवा मंदिरावर भोंगा नाही. त्यामुळे सामाजिक सलोखा कायम जपत सर्व धर्मिय उत्सव सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार पडतात. विशेष म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदानातून जगाला शांततेचा, बंधूभावाचा संदेश दिला आहे. त्यांची संजीवन समाधी येथे आहे. त्यामुळे आळंदी पंचक्रोशीतील नागरिक कोणताही भेदभाव न करता एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन उत्साहात कार्यक्रम होतात.
दरम्यान, आळंदी पोलिसांकडून विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात. शनिवारी (दि.३०) मुस्लिम बांधवासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.