कोल्हापूर – गजेंद्र पाटील म्हणजे परमबीर सिंगचा दुसरा भाऊच दिसतो. वर्दीतील हे दरोडेखोर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आडून हजारो कोटींचा गैरव्यवहार लपवू पाहात आहेत. वर्दीतील हे दरोडेखोर लवकरच गजाआड जातील, असा सूचक इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय न्याय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करून त्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित असलेल्या परिवहन खात्याच्या गजेंद्र पाटील या उपनिरीक्षकांने गुन्हा दाखल करून सीबीआयकडे चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात कागलमध्ये पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, ज्या पद्धतीने परमबीर सिंग यांनी खोटे पत्र देऊन अनिल देशमुख यांच्यासारख्या चांगल्या मंत्र्याचा राजीनामा द्यायला लावला होता त्याच पद्धतीचे हे षड्यंत्र आहे. माझी अजूनही मागणी आहे की, मुकेश अंबानींच्या घरासमोरील ती स्फोटके, त्या गाडीचं पुढे काय झाले? त्याचा मास्टर माईंड कोण आहे? हे एनआयएने तत्काळ तपास लावून जाहीर केले पाहिजे. कारण, जनता या सगळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
केंद्राने रुपयासुद्धा दिलेला नाही
केंद्र सरकारने जीएसटीच्या परताव्या पोटीचे 24 हजार कोटी रुपये दोन वर्षांपासून दिलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसह पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यांचा दौरा करून त्यांना एक हजार कोटींचे पॅकेज दिले. परंतु; गेल्याच आठवड्यात झालेल्या चक्रीवादळाच्या नुकसानीपोटी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एक रुपयासुद्धा दिलेला नाही. या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार सतत महाराष्ट्राचा अपमान आणि खच्चीकरण करीत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.