ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेगन मर्केल यांनी ओप्रा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत जी धक्कादायक विधाने केली, त्यावरून वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइड प्रकरणानंतर पाश्चात्य जगतात अश्वेतांसाठी आंदोलन झाले. मात्र गोरा रंग असणे श्रेष्ठत्वाचे लक्षण मानण्याची मानसिकता जगभर आहे. वर्णभेदाविरुद्ध आफ्रिकेत आंदोलन छेडणाऱ्या महात्मा गांधींच्या भारतातही तशी मानसिकता असणे दुर्दैवाचेच नव्हे का?
ब्रिटनचे राजकुमार हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेगन मर्केल यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध “होस्ट’ ओप्रा विन्फ्रे यांना दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या मुलाखतीत मेगन मार्केल यांनी असे सांगितले की, राजघराण्यातील एका सदस्याने त्यांचे पती प्रिन्स हॅरी यांना होणाऱ्या बाळाच्या रंगाविषयी चिंता व्यक्त केली होती. आपल्याला स्वतःला आर्ची या आपल्या मुलीच्या रंगामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता, असेही या सदस्याने हॅरी यांना सांगितले होते.
आपल्या मुलाच्या रंगाचा विषय राजघराण्यातील सदस्यांना चिंतेत टाकणारा होता, असे भावूक होऊन सांगताना मेगन मर्केल या मुलाखतीत दिसल्या. जेव्हा त्यांच्या मुलाचा जन्म व्हायचा होता, तेव्हा त्याचा रंग कसा असेल, याविषयी राजघराण्यातील सदस्यांना चिंता वाटत होती. या विषयावरून अनेकदा चर्चाही होत होती.
राजघराण्यातील लोकांनी प्रिन्स हॅरी यांच्याशी मुलाच्या रंगाविषयीही चर्चा केली होती. परंतु आपल्या मुलाच्या वर्णावरून टिप्पणी करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची नावे सांगण्यास मेगन यांनी नकार दिला. मेगन यांच्या मातोश्री मूळ आफ्रिकी वंशाच्या अमेरिकन (आफ्रो-अमेरिकन) आहेत आणि त्यांचे पिता गौरवर्णी अमेरिकी आहेत. म्हणूनच मेगन यांच्या मुलाचा जन्म होण्यापूर्वी त्याच्या रंगाविषयी राजघराण्यातील काही सदस्यांना चिंता वाटत होती.
याच मुलाखतीत मेगन मार्केल यांनी सांगितले की, प्रिन्स हॅरी यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर त्यांना वेगळे केले गेल्यामुळे राजघराण्यातील व्यक्तींना भेटूही दिले जात नसल्याने त्यांच्या मनात आत्महत्येचेही विचार येऊ लागले होते. त्यांच्या या मुलाखतीनंतर राजघराण्याकडून असे सांगण्यात आले की, रंगभेदाचा मुद्दा मुलाखतीत जरा जास्तच गांभीर्याने घेतला गेला आहे. राजघराण्याच्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षे हॅरी आणि मेगन यांच्यासाठी आव्हानात्मक होती, हे ऐकून संपूर्ण राजघराणे
दुःखी आहे.
वास्तविक, या मुलाखतीत उपस्थित झालेले मुद्दे, विशेषतः रंगभेदाशी संबंधित मुद्दे अत्यंत चिंताजनक आहेत आणि ते गांभीर्याने घेतले गेले आहेत. राजघराण्याकडून व्यक्तिगत पातळीवर त्यावर तोडगा शोधला जाईल. ही आणि अन्य काही घटना असे दाखवून देतात की, भले आपण एकवीसाव्या शतकात पोहोचलो असलो तरी वर्णद्वेषी मानसिकतेतून मुक्त झालेलो नाही. आपला वंश इतर वंशांपेक्षा श्रेष्ठ आहे, असा गैरसमज आजही असंख्य लोकांच्या मनात आहे. अमेरिका ही जगातील सर्वांत जुनी लोकशाही आहे, परंतु हाही देश वंशवादापासून अद्याप मुक्त होऊ शकलेला नाही.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड ही अश्वेत व्यक्ती वर्णभेदाची शिकार ठरली होती आणि त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाने एवढी खळबळ माजली की केवळ अमेरिकेतच नव्हे तर युरोपातही “ब्लॅक लाइव्हज मॅटर’ नावाचे आंदोलन भडकले. अश्वेतांचा प्राण मोलाचा आहे, असा संदेश या आंदोलनाने दिला.
अमेरिकेच्या दोनशे वर्षांच्या लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच कमला हॅरिस या अश्वेत मूळ असलेल्या दक्षिण आशियाई महिला देशाच्या उपराष्ट्रपती बनल्या आहेत. राष्ट्रपती जो बायडेन यांनी अमेरिकी लष्कराचे निवृत्त जनरल लॉइड ऑस्टिन यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी कोणत्याही अश्वेत व्यक्तीला संरक्षणमंत्रिपद दिले गेले नव्हते.
वंशवादाची विषवल्ली संपूर्ण जगभरात अस्तित्वात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नुकत्याच झालेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियातील काही प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंवर वंशवादी शेरेबाजी केली होती. यामुळे सामनाही काही काळ थांबवावा लागला होता. स्क्वेअर लेग बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करीत असलेल्या मोहंमद सिराज या खेळाडूने आपल्याला उद्देशून प्रेक्षकांनी “ब्राउन डॉग’ हा अपशब्द उच्चारल्याची तक्रार केली आणि भारतीय खेळाडू मैदानाच्या मध्यभागी एकत्र आले.
यापूर्वीही जसप्रित बुमराह आणि मोहंमद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली होती. परंतु ही समस्या केवळ पाश्चात्य देशांची आहे, असे आपण गृहित धरून चालणार नाही. भारतातही वर्णद्वेषाची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. गोरा वर्ण ही श्रेष्ठत्वाची खूण आहे आणि सावळा वर्ण दुय्यम वागणूक मिळण्यास पात्र आहे, असे आपल्याही समाजात मानले जाते.
विवाहसंबंधीच्या जाहिरातींमध्ये आपण पाहिले तर बहुतांश कुटुंबांना गोरी सून हवी असते. ज्याला सावळी सून हवी आहे, असे कुटुंब अभावानेच सापडेल. हा रंगभेद नाही तर काय आहे? भारतीय समाजातसुद्धा गोरेपणा हे सौंदर्याचे परिमाण आहे. स्वतःचा मुलगा काळाकुट्ट असला तरी सून मात्र सर्वांना दुधासारखी गोरी हवी असते. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, सावळ्या वर्णाची मुलगी जन्माला आली तर आईवडील कमीपणाच्या भावनेने ग्रस्त होतात.
अशा स्थितीत काळ्या-गोऱ्याच्या कारणावरून मुलींनी आत्महत्या केल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. गर्भावस्थेत महिलेच्या खाण्यापिण्यात जे येते त्याचा गर्भातील अर्भकाच्या रंगावर परिणाम होतो अशीही भ्रामक समजूत आपल्या समाजात असंख्य लोकांची आहे. मूल गोरे जन्मास यावे म्हणून घरातल्या आज्या गर्भवती महिलेला आजही संत्री खाण्याचा सल्ला देतात आणि जांभळासारखी फळे खाण्यास अटकाव करतात.
काही वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजचा खेळाडू डॅरेन सॅमी याने अशी तक्रार केली होती की, सनराइज हैदराबाद संघाकडून खेळताना त्याला वर्णद्वेषी टिप्पणीला सामोरे जावे लागले होते. आपल्या देशातही आफ्रिकेतील लोकांकडे त्यांच्या रंगामुळे विचित्र नजरेने पाहिले जाते. एखाद्या शहरात आफ्रिकी विद्यार्थ्याला अकारण मारहाण केल्याच्या घटना वारंवार घडतात. राजधानी दिल्ली आणि अन्य काही शहरांमध्ये आफ्रिकी देशांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेतात.
आपल्याकडील लोक नेहमी त्यांच्या रंगावरून शेरेबाजी करतात. अशा प्रकारच्या अपमानकारक वागणुकीला त्यांचा काळा रंगच कारणीभूत ठरतो. काही दिवसांपूर्वी अशा घटनांमध्ये जेव्हा वाढ झाली होती, तेव्हा आफ्रिकी देशांच्या राजदूतांनी एकत्र येऊन या घटनांकडे भारत सरकारचे लक्ष वेधले होते आणि हा वर्णद्वेषच असल्याचा आरोप केला होता. एवढेच कशाला, आपल्याच देशाच्या ईशान्येकडील राज्यांत राहणाऱ्या लोकांचे चेहरे आपल्यापेक्षा खूप भिन्न असतात. या कारणामुळे त्यांच्याबाबतही भेदभाव केला जातो आणि त्यांना वारंवार अपमानितही केले जाते.
ब्रिटनमधील भारतीयांच्या मनातही वर्णभेदाचे रोपण खोलवर झाल्याचे पाहायला मिळते. तेथील भारतीय समाजात गोरी सून हवी असते; पण अश्वेत सून स्वीकारार्ह मानली जात नाही. वस्तुतः अश्वेत समाज हा ब्रिटनच्या समाजाचा एक अभिन्न भाग आहे. वर्णद्वेष आणि रंगभेदाच्या विरोधात संघर्ष सर्वप्रथम सुरू करणाऱ्या महात्मा गांधींनी ज्या देशात जन्म घेतला त्या भारतात वंशवादाची पाळेमुळे इतक्या खोलवर रुजलेली असतील, तर त्याच्याइतके दुर्दैव कोणते?
पीटरमारित्झबर्ग या दक्षिण आफ्रिकेतील शहराच्या रेल्वे स्थानकावर 1893 मध्ये महात्मा गांधींना अवमानित करणारी वंशद्वेषाची घटना घडली होती. याच रेल्वे स्थानकावर एका गोऱ्या सहप्रवाशाने मोहनदास करमचंद गांधी यांना धक्के देऊन रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकून दिले होते. याच घटनेमुळे ते पुढे “महात्मा गांधी’ बनले आणि रंगभेदाविरुद्ध, वर्णद्वेषाविरुद्ध त्यांनी संघर्ष सुरू केला. या महात्म्याच्या देशातील लोकांनी तरी किमान रंगावरून माणसाची किंमत करणे बंद करायला नको का?
– विनिता शाह