वाई – वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभळीपूल ते आकोशी ते कोंडवली या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या परिसरातील नागरिक रस्त्याच्या दूरवस्थेमुळे त्रस्त आहेत. जिल्हा परिषेदचा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून काही संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत.
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील मुख्य रस्त्यांवर परतीच्या पावसाने मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर खड्डे आहेत की बंधारे बांधण्यात आले आहेत, हेच वाहनचालकांना कळेनासे झाले आहे. खड्ड्यांची खोली चार ते पाच फुटांची आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये काहींचे जीव जागेले, कित्येक जण जायबंदी झाले. अनेकांना कायमचा पाठीचा आजार सुरु झाला.
डॉक्टरांच्या मते रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मणक्यामध्ये गॅप तयार होवून अनेकांचे वाहन चालविणे बंद झाले आहे. मुळातच या भागातील लोक प्रचंड सोशिक असल्याने कोणी तक्रार करण्यास धजावत नाही, याचाच फायदा ठेकेदार घेतात. वाहनांचे होणारे नुकसान वेगळेच! शासनाला कोणत्या कारणासाठी कर भरण्यात येतो हेच अजून लोकांना समजत नाही.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालक, रस्त्यावरील खड्यांमुळे त्रस्त असून रस्त्याची अवस्था बिकट होऊनही दुरुस्ती केली जात नाही. पर्यटन वाढीसाठी कसे प्रयत्न करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. पर्यटक खड्ड्यांमुळे हैराण होत आहेत. नाराजी व्यक्त करीत आहेत.
खड्ड्यांच्या प्रश्नांसंदर्भात तालुक्यातील संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला निवेदन देण्यात येणार आहे. खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टीसुध्दा करण्यात येत नाही. टाकला तरीही तो मुरूम दोन दिवसांत पावसामुळे माती होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह सर्वांचाच जीव मेटाकुटीस आला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती त्वरित करावी व लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे. सर्वच रस्ता खराब नसून जांभळीपूल ते आकोशी ते कोंडवली या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी या भागातून होत आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्या असल्याने त्याही अपघातास निमंत्रण देत आहेत. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग गांधारीच्या भूमिकेत असल्याने एखादा मोठा अपघात होण्याची वाट संबंधित विभाग पाहतोय की काय हाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.