सातारा -भारत-चीन सीमावाद सुरू आहेत. राष्ट्र सुरक्षेमध्ये राजकारण करू नये. परंतु, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा हक्क असून केंद्र सरकारने त्याची उत्तरे दिली पाहिजेत. आम्ही जनतेच्यावतीने सरकारला प्रश्न विचारत आहे. आम्ही आमचा घरगुती प्रश्न विचारत नाही. विरोधी पक्षाने विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तरे दिलीच पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
साताऱ्यात कॉंग्रेसच्यावतीने कॉंग्रेस भवनसमोर इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ना. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, मनोहर शिंदे, रजनी पवार, सुषमा राजेमहाडिक आदी उपस्थित होते. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “”लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली असून यामुळेच देशभरात इंधन दरवाढ करण्यात आली आहे.
करोनाशी लढताना केंद्र सरकारमध्ये समन्वय नसल्याने जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलिन झाली आहे. करोनाला भारतासह इतर देशही तोंड देत आहेत. त्या देशांनी सरकारी तिजोरी लोकांसाठी खुली केली आहे. हे देश थेट लोकांच्या खात्यावर पैसे टाकत आहेत. परंतु, मोदी सरकारकडून असे काही झाले नसल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. केंद्र सरकारकडून दोन लाख कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
त्याचीच वसूली इंधन दरवाढ करून केली जात आहे. मोदी सरकारने त्यांच्या कार्यकाळात नऊ वेळा एक्साईज ड्युटी वाढवली आहे. करोनाकाळात दिलासा देण्याऐवजी सरकारने जिझिया कर लावला आहे. गेल्या सहा वर्षात सरकारला कररूपी साडेचौदा लाख कोटींचे उत्पन्न मिळाले आहेत. हे पैसे सरकारने एका हाताने दिले ते पैसे दुसऱ्या हाताने घेतले.”करोनाचे संकट असताना दुसरीकडे भारत- चीन सीमावादाने देश दुहेरी संकटात आहे. परंतु, येथे सरकारने बोटचेपी भूमिका घेतली आहे. मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था सलग कोसळत होती. यामुळे भारताचे पतमानांकन कमी झाले आहे. सर्व बाजूंनी अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे.