सातारा – करोनाच्या थैमानामुळे जिल्हयात बाधित रुग्णांची डबल सेंच्युरी झाली. दररोज हजारभर मुंबई, पुणेकर व मूळ जिल्हावासिय परतत असल्याने गावाकडील लोकांच्या झोपा उडाल्या आहेत. जिल्हयाची आरोग्य सेवा सलाईनवर आणणारे पुणे, मुंबईकरांचे इनकमिंग हद्दीवर रोखून तिथेच संबधितांची टेस्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्ह्याचा करोना मीटर दिवसेंदिवस झपाट्याने पळतोच आहे. मध्यंतरी काही दिवस रुग्ण सापडणे कमी झाले असतानाच बाहेरून येणाऱ्यांमुळे करोना मीटर पुन्हा गतीने वाढू लागला. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार तब्बल 25641 लोक कोणताही परवाना न घेता जिल्हयात परतले आहेत. बाहेरून आलेल्यांमुळे जिल्ह्यापुढे मोठे संकट आहे.मुंबई, पुण्यातून येऊच नका, हे म्हणणे योग्य नाही. पण, ते आले तर त्यांच्यापासून धोका उदभवणार नाही, याची दक्षता समाज, प्रशासनाने घेतलीच पाहिजे. सध्या ती दक्षता घेतली जात नसल्याने आता वनवासमाची, मलकापूर, म्हासोली, कराड याशिवाय इतर गावांत करोनाचे पेव फुटले आहे. दररोज नवनवीन गावात रुग्ण सापडत आहेत. मंगळवारी 28, बुधवारी 15 व गुरूवारी 20 असे तीन दिवसांतच 63 रुग्ण जिल्ह्यात वाढले.
जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना केवळ थर्मल स्क्रिनिंग करुन जिल्ह्यात पाठविले जात आहे. कोणामध्ये लक्षणे दिसली तरच त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले जाते. मात्र, लक्षणे नसलेले वाहक थेट गावापर्यंत पोहचत आहे. बाहेरून आलेल्या सायलेंट कॅरियरने ग्रामीण भागाच्या काळजाचा ठोका चुकविला आहे. जिल्ह्यात कृष्णा हॉस्पिटलला केरोनाची टेस्ट करण्याची परवानगी मिळाली असली तरी तेथे केवळ दिवसाकाठी जास्तीत जास्त 40 टेस्ट होत आहे. पुण्याहूनही सरासरी आपल्याला 100 ते 150 टेस्ट रिपोर्ट मिळत आहे.
आपल्या तुलनेत कोल्हापूरला तीन लॅब असून, त्याशिवाय पुणे, मिरज येथूनही टेस्ट करुन घेतल्या जात आहेत. तेथे परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येकाची टेस्ट केली जात आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आले तरच होम क्वारंटाईन केले जाते. अन्यथा कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवले जाते. त्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात टेस्टचे प्रमाण वाढवून परजिल्ह्यातून येणाऱ्याच्या सरसकट टेस्ट करण्याचे नियोजन केले पाहिजे. टेस्टची न वाढणारी गती, कुशल वैद्यकीय यंत्रणेची वानवा, वैद्यकीय स्पेशालिस्टची वानवा या सर्वच गोष्टी अडचणीच्या आहेत. करोना जिल्हाभर हातपाय पसरतोय त्यामुळे अख्खा जिल्हा कंटेन्मेंट झोन बनण्याची भीती आहे.