चिंबळी -येथील परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून विहिरी खोदकाम आणि बोअरवेल घेण्याचे काम सुरू केले असून, जवळपास दीडशे ते दोनशे बोअरवेल घेतले आहेत. गेल्या एक महिन्यापासून जवळपास आठ ते दहा विहीरींचे खोदकाम करून बांधकाम सुरू आहे.
खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र देहू व आळंदी या पुण्यभूमीमधून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीवर महाराष्ट्र सरकार जलसंपदा विभागाच्या वतीने गेल्या 35 ते 40 वर्षांपूर्वी विविध ठिकाणी केटी पध्दतीचे बंधारे बांधले आहेत. देहू ते आळंदी परिसरातील तळवडे, निघोजे, मोई, कुरूळी, मोशीसह चिंबळी, केळगाव, डुडूळगाव, चऱ्होली खुर्द परिसरात शेतीसाठी व पिण्यासाठी पाणीसाठा मुबलक असल्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांनी इंद्रायणी नदीवर शेतीपंप बसवून बाराही महिने विविध प्रकारची पिके घेत आहेत;
परंतु या परिसरात गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रात वाढ झाली असल्याने छोट्या-मोठ्या कंपन्या वाढल्या असल्याने रोजंदारीमुळे रहदाराही वाढली आहे, त्यामुळे सांडपणी आणि ऑईलमिश्रीत पाण्याची विल्हेवाट न लावता ते पाणी थेट मोई-चिखली हद्दीतील इंद्रायणीच्या पाण्यात सोडले जात असल्याने नदीचे पाणी काळपट होऊन जलपर्णीही वाढली आहे, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, दुर्गंधी पसरल्याने डासांचे प्रमाणात वाढ झाल्याने हे पाणी शेतीसाठी, पिण्यासाठी धोकादायक ठरते आहे. यासाठी चिंबळी परिसरात पाण्यासाठी नव्याने बोअरवेल खरेदीचे काम सुरू केले आहे.