अरुण गोखले
एका योगासन वर्ग़ाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना योगाचार्य म्हणाले की, ज्याप्रमाणे महिला वर्ग हा घरातला स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर जपून, काटकसरीने वापरतात. त्याप्रमाणे आपण भगवंताने आपल्या जन्माबरोबर जो आणि जेवढा म्हणून श्वासाचा सिलिंडर भरून दिला असेल तो ज्याने त्याने काटकसरीने वापरायला हवा. कारण एकवेळ स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर संपला की तो पुन्हा मागवता येतो; पण जीवाच्या जन्माबरोबर ईश्वराने त्याच्यासोबत भरून दिलेला श्वासाचा सिलिंडर हा रिकामा झाला तर तो परत रिफिलिंग करता येत नाही किंवा त्याची रिप्लेस्मेंट होत नाही.
मानवी जीवनात श्वासाला फार मोठे महत्त्व आहे. कारण जीवाने घेतलेला पहिला श्वास हा त्याचा जन्म असतो तर त्याने सोडलेला शेवटचा श्वास हा त्याचा मृत्यू. या दोन श्वासांमधले अंतर म्हणजेच जीवन किंवा आयुष्य. ते कोणास किती दिलेले आहे ते त्या एका भगवंतासच ठाऊक असते.
अनेकदा आपण अनेक अनावश्यक गोष्टीसाठी आपल्या शरीरावर आणि मनावर ताण घेत असतो. काही बाबतीत सतर्कता न राखल्याने ऐनवेळी करावी लागलेली धावपळ, घाईगडबड, पळापळ अशावेळी आपल्याकडचा श्वास हा मोठ्या प्रमाणावर गरजेपेक्षाही जास्त वापरला जातो.
“”अरे बाबा थांब! कशाला इतकी जीवाची थावपळ करतोस. थोडा दम घे. श्वास टाक,” असं आपण सांगतो बोलतोही; पण ते इतरांना सांगताना. आपण मात्र स्वत: तीच चूक करत असतो. नको त्या गोष्टीचाही ताण घेऊन आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेतो, त्यामुळेच हे सांगावे लागते की बाबांनो! श्वासावर लक्ष द्या. तुमचा श्वासाचा सिलेंडर जपून वापरा.
आपणच आपल्या श्वासावर नियंत्रण कसे ठेवायचे. तो पुरवून म्हणजेच दीर्घ श्वसन करून प्राणायाम करून त्याचा अपव्यय कसा टाळायचा आणि निरोगी दीर्घायुषी जीवन कसे जगायचे, हे जे शास्त्र आपल्याला शिकवते. ते शास्त्र म्हणजे योग शास्त्र. श्वास कसा घ्यायचा तो कसा आणि किती वेळ कोंडायचा, सोडतानाही कसा सोडायचा या गोष्टी आपण जर प्रयत्नाने आत्मसात केल्या तर नक्कीच आपल्याला त्या श्वासाच्या सिलेंडरचा अचूक उपयोग केव्हा कसा आणि कोणत्या प्रकारे करायचा हे समजेल. त्यासाठीच हा योगाभ्यास आणि ही साधना.