मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांचे आश्वासन
वाल्हे – गेल्या अनेक वर्षांपासून पुरंदरमधील बावीस गावांच्या शेत-जमिनीवरील पुनर्वसनासाठी आरक्षित असा शिक्का काढण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. येत्या महिनाभरात हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे आश्वासन पर्यावरण, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांनी दिले आहे.
वाल्हे (ता. पुरंदर) येथे शनिवारी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री भेगडे बोलत होते. याप्रसंगी बाळासाहेब गरुड, संगीताराजे निंबाळकर, गिरीश जगताप, पंडित मोडक, आर. एन. जगताप, सुदर्शन चौधरी, सम्राट यादव, राहुल शेवाळे, सरला तिवारी, आदेश भुजबळ, कांतीलाल पवार, चंद्रकांत सासवडे, कुंडलिक पवार, सचिन दोशी आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री भेगडे म्हणाले की, पुरंदरमधील शेकडो कामगार लोणंद येथील सोना अलॉईज कंपनीमध्ये काम करीत आहेत. तेथील कामगार विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत, परंतु यापुढे कामगारांना आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. कामगारांना हक्काचे घर, सुरक्षितता, विमा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या दहा-बारा दिवसांमध्ये लोणंद येथील कामगारांचा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांनी केले तर सागर मदने यांनी सूत्रसंचालन केले.