मिरत (उत्तर प्रदेश) : सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात देशव्यापी आंदोलनाची सुरवात जेथून झाली, त्या शाहीनभागचा समावेश असणाऱ्या दिल्लीच्या ओखला मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा तब्बल 71 हजार 827 मतांनी आपचे उमेदवार अमानुल्लाखान यांनी पराभव केला. मात्र, त्यांच्या मूळ गावी त्याबद्दल जल्लोष करणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेदम मारहाण केली. मिरत जिल्ह्यातील परीक्षितगृह पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत अगवनपूर येथे ही घटना घडली.
अमानुल्ला खान विजयी झाल्याची घोषणा केल्यानंतर थोड्याच वेळात मंगळवारी सायंकाळी जल्लोष करण्यास सुरवात केली. त्यानंतर थोड्याच वेळात पोलिस पथक तेथे आले. त्यांनी अमानुल्लाखान यांच्या नातेवाईकांवर लाठीमार करण्यास सुरवात केली. त्यांनी बेदम लाठीमार केला. यात आलेल्या पुरूष पोलिसांनी घरातील तरूण मुलींशी असभ्य वर्तन केले. त्यांचे केस धरून ओढत त्यांना रस्त्यावररून फरफटत नेण्यात आले, असे आरोप केले जात आहेत.
दरम्यान, पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. तेथे जमावबंदी लागू असल्याने आम्ही मिरवणूक रोखली. आम्ही कोणत्याही बळाचा वापर केला नाही. मात्र जमावबंदी मोडल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे, असे परीक्षितगृह पोलिस चौकीचे अधिकारी कैलास चांद यांनी सांगितले. 13 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात प्राधान्याने आप आमदाराचे नातेवाईक असणाऱ्या नूर उल्ला यांचा उल्लेख आहे.
या सर्व प्रकरणावर आमदार अमानुल्लाखान यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्या विजयाचा आनंद माझ्या नातेवाईकांनी एकत्र येऊन साजरा करण्यात अडचण काय आहे, हेच मला समजत नाही भाजपा आणि योगी सरकारच्या द्वेषाच्या राजकारणाच्या प्रतिक आहेत.