वानवडी, दि. 25 (प्रतिनिधी) -महानगरपालिकेच्या सात एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या कै. विठ्ठलराव शिवरकर उद्यानातील सर्वात मोठे असलेले कारंजे गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. हे कारंजे उन्हाळ्यात सुरू होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु, आता उन्हाळा गेला, पावसाळातही संपत आला आहे तरीही या उद्यानाची शोभा वाढविणारे कारंजे बंद असून उन्हाळ्याच्या दिवसांत कारंज्यातून पाणी उडणे अपेक्षित असताना आता या कारंज्याच्यात आता पावसाचे पाणी साचले आहे.
वानवडी परिसरात महानगरपालिकेच्या वतीने शिवरकर उद्यान तयार करण्यात आले आहे. या उद्यानामध्ये अवाढव्य कारंज्याची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पावर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उद्यानाचे सुशोभिकरणातून हे कारंजे उभारण्यात आले असले तरी गेली कित्येक महिने ते बंद आहे. त्यात शेवाळ वाढले तसेच ते स्वच्छ करण्यासह त्याची दुरूस्ती करणे गरजेचे होते. याबाबत नागरिकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत तक्रारी केल्यानंतर ते सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु, उन्हाळ्यात सुरू होणारे हे कारंजे आता पावसाळा संपत आला तरी सुरू झालेले नाही. या उद्यानातील बाकांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. खेळांच्या साहित्य मोडलेले आहे. उद्यानात सफाई, स्वच्छता करण्याची गरज आहे.