लोणी काळभोर : गेल्या काही वर्षात करोना महामारीसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांना खूप मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. यंदा पाऊस सरासरीएवढा पडेल या हवामान खात्याच्या अंदाजामुळे आनंदित झालेला शेतकरी पावसाची वाट बघून कंटाळला आहे. मृग नक्षत्रासह जून महिनाही निम्मा संपला तरी पाऊस न पडल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.
गेल्या दहा पंधरा वर्षांत पुणे शहर व जिल्ह्यात वळवाचा पाऊस अजिबात पडत नाही. त्यामुळे बळीराजाचे लक्ष 7 जूनला सुरू होणाऱ्या मृग नक्षत्राकडे लागलेले असते. यंदा मृग नक्षत्रही कोरडे ठणठणीत गेले. आता रिमझिम पावसाचा आषाढ महिना सुरु झाला. आता 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. तरीही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.
अधून मधून पावसाच्या हलक्या सरीही येत नाहीत. शेतकऱ्यांच्या भाषेत जोरदार पाऊस सोडा, भिज पाऊस किंवा मूर पाऊसही पडत नाही. जमिनीत पाणी मुरणार नाही. त्यामुळे जमिनीत खोल गेलेली पाण्याची पातळी वाढणार नाही. पालखी सोहळ्या दरम्यान वरूणराजाचे आगमन अजिबातच न झाल्याने सर्वांनाच चिंता वाटत आहे.
एकीकडे मशीगतीची सर्व कामे पूर्ण झाली असली, तरी पेरणीयोग्य पावसाची अद्याप प्रतिक्षा कायमच आहे. रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर वळवाचा पाऊस पडेल ही अपेक्षा शेतकऱ्यांसह सर्वांनाच होती. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
अनेक वर्षांनतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनीही उसनवारी किंवा जसे जमेल तसे खते, बियाण्यांचे नियोजनही केले. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतांनाच अचानक पावसाने दडी मारली. मात्र, मान्सूनची कृपादृष्टी अद्याप झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.
आवर्तन मिळाले नसते तर…
यंदा उन्हाळ्यात नवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी बंद झाले नाही. उन्हाळ्यात हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीला व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. गेल्या काही वर्षांपासून जुना मुठा कालव्याला पाणी येत आहे. या पाण्याला अशुद्ध व घाण पाणी म्हणून अनेक लोकांनी सुरवातीला नावे ठेवली. परंतु नंतर मात्र याच लोकांनी या घाण पाण्यावरच भाजीपाला पिकवून लाखो रुपये कमावले. हे पाणी उपलब्ध झाले नसते तर आज पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नसता. आगामी काळात वेळेवर पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.