पुण्यातील विठ्ठल मंदिरांचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते की, ही जवळजवळ सर्वच मंदिरे संतांच्या मांदियाळीत संतांच्या सान्निध्यात असलेली आणि वारकरी परंपरेशी निगडित अशीच आहेत. पांडुरंगाचे ध्यान आणि रुक्मिणी मातेचे सौभाग्य, अशी ही सांगड घातलेली आहे. याचीच प्रचीती लकडी पूल विठ्ठल मंदिर पाहताना येते. मात्र, या मंदिराचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यासह त्यावेळी शहरात येणाऱ्या क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांचे पुण्यातील मुख्य ठिकाण होते.
टिळक चौकात अलका टॉकिजच्या शेजारी शास्त्री रस्त्याने पुलाकडे येताना डावीकडे हे सुंदर जुने पेशवेकालीन विठ्ठल मंदिर सहज नजरेस पडते. त्यातही सायंकाळची वेळ असेल तर येथे सुरू असलेले भजन, कीर्तन, प्रवचन याच्या आवाजाने सहजच पाय मंदिराकडे वळतात. प्रशस्त लाकडी दरवाजा, तसाच मोठा सभामंडप आणि आत गेल्यावर सर्व देवांच्या असलेल्या मूर्ती वातावरण प्रसन्न करते.
या मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, विष्णू, गरूड, खंडोबा, देवी, दत्त, हनुमान या सर्वांचेच दर्शन होते आणि यानंतर मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते. येथेच गाभाऱ्यात शंकराची पिंड असून पुढे नंदीही आहे आणि त्याचबरोबर श्रीगणेशजीही विराजमान आहेत.
मंदिर पेशवेकालीन असल्याने आणि नदीकाठी असल्याने येथील नदीचा घाट आणि मंदिराचा परिसर याचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मंदिराला प्रशस्त प्रांगण आहे. नदीपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची उतरणही आहे. कै. शंकर रामभाऊ भोरात हे या मंदिराचे संस्थापक-अध्यक्ष होते. त्यांच्या चार पिढ्यांनी या मंदिराची देखभाल पाहिली असून सध्या दीपक थोरात हे येथे कोषाध्यक्ष पदावर आहेत आणि मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहेत.
“रॅण्ड’च्या खुनाच्या कटाचे ठिकाण…
या मंदिरात रॅण्डच्या खुनाचा कट रचला गेला. येथेच लोकमान्य टिळक आणि चापेकर बंधू यांच्यात या रॅण्डच्या अत्याचाराला कंटाळून त्याच्या खुनाचे नियोजन केले गेले. या मंदिरामागे असलेल्या गायमुखाचे पाणी हातात घेऊन चापेकर बंधूंनी पुढच्या दहा दिवसांत रॅण्ड संपणार, असा संकल्प टिळकांसमोर केला आणि 22 जूनला रात्री गणेश खिंडीत रॅण्डला गाठून त्याची हत्या करण्यात आली. रॅण्ड संपला ही बातमी टिळकांपर्यंत “खिंडीतील गणेश पावला’, असा संकेत देत पोहोचवण्यात आली.
मढ्या विठोबा : पुण्यातील या मंदिराच्या मागे पूर्वी स्मशानभूमी होती. आताही वैकुंठ स्मशानभूमी येथून जवळच आहे; पण, याचमुळे या विठ्ठलाला मढ्या विठोबा म्हणूनही ओळखले जाते.
108 मंदिरांपैकी एक : उत्तर प्रदेशातील झांशी शहरातील जोतीपंतबुवा महाभागवत यांनी पेशवाईच्या काळात 108 मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता. त्यातले एक लकडी पूल विठ्ठल मंदिर आहे.
कळसातील गुप्त खोली : या मंदिराच्या कळसात एक गुप्त खोली आहे. या खोलीचा वापर क्रांतिकारक ब्रिटिशांच्या विरोधात कट रचण्यासाठी करीत असत. आजही ही खोली येथे आहे.
“इंद्रायणी काठी’ची चाल भीमसेनजींनी येथेच आळवली…
भारतरत्न भीमसेन जोशी हे मूळचे बेळगावचे; पण, पुण्यात आल्यावर शास्त्रीय संगीताचा रिजाय ते या मंदिरात बसून करीत असत. याचबरोबर त्यांच्या गाण्याच्या सुरुवातीच्या मैफली याच मंदिरात झाल्या. “इंद्रायणी काठी देवाची आळंदी…’ या गाण्याची चाल याच मंदिरात भीमसेनजींनी लावली आणि या गाण्याचे सूर सर्वदूर पसरले.