शरद पवार : पडळच्या साखर कारखान्यास सर्वतोपरी सहकार्य करणार
मायणी – बदलत्या परिस्थितीचा फायदा घेत दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी देण्यासाठी निश्चित स्वरूपाचा मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले जाईल. जलसंपदामंत्री जयंत पाटील, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, डॉ. दिलीप येळगावकर, ना. रामराजे नाईक निंबाळकर व दुष्काळी पट्ट्यातील पाणीप्रश्नाचा अभ्यास असणाऱ्या कार्यकर्त्यांसह आठ-दहा दिवसांत बैठक होईल, खटाव माणमधील साखर कारखान्यांना ऊस कमी पडणार नाही, यासाठी सर्व स्तरावर पायाभूत सहकार्य करू, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधयक्ष शरद पवार यांनी सांगितले.
पडळ (ता. खटाव) येथील खटाव- माण तालुका प्रो.लि. साखर कारखान्याच्या दोन लाख 51 हजाराव्या साखर पोत्याच्या पूजनाप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे, को- चेअरमन मनोजदादा घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, नंदकुमार मोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी आमदार दिलीप येळगावकर, प्रभाकर देशमुख, सुरेंद्र गुदगे, रणजितसिंह देशमुख, रत्नागिरी जिल्हा बॅंकेचे चेअरमन तानाजीराव चोरगे, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे चेअरमन सतीश सावंत, सत्यजितसिंह पाटणकर, सुभाषराव शिंदे, महेश घाडगे, सभापती रेखाताई घार्गे, विजय काळे, रवींद्र सानप, कारखान्याच्या संचालकांसह प्रमुखांची उपस्थिती होती.
या भागातला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे सूतोवाच करून पवार म्हणाले, “”पाणीप्रश्न सुटल्यावर ऊसशेती वाढेल. मात्र, पाणी ठिबक सिंचनाने देणे गरजेचे आहे. पाटाच्या पाण्याने एक एकर ऊसाला जेवढे पाणी लागते त्याच पाण्यात ठिबकद्वारे तीन एकर ऊस जोपासला जातो. जागतिक पातळीवर ऊस क्षेत्र व तयार साखरेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ऊस कारखानदारीस चांगले दिवस येतील. पुढची कारखानदारी केवळ ऊस एके ऊस, साखर एके साखर अशी न राहता अनेक उत्पादने करणारी होईल.
पुण्याजवळ मांजरी येथे येत्या 21 तारखेला जगातील 22 देशांतील ऊस उत्पादक तज्ज्ञांची ऊस, इथेनॉल व वीजनिर्मितीसंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी निधी देण्याबाबत सरकारबरोबर चर्चा करून शेतकरी हिताचा निर्णय घेतला जाईल.”
प्रभाकर घार्गे उद्योगपती असल्याने पडळचा कारखाना शेतकऱ्यांचे हित साधणारा कारखाना म्हणून नावारूपाला येईल. आवश्यक कामगारांवर कारखाना चालू राहिला पाहिजे. कारखान्यात नोकरीसाठी तगादा लावू नका, असा सल्लाही शेतकऱ्यांना दिला. बीटापासून साखर उत्पादनाबद्दल अभ्यास चालू असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याकडून क्षमतेपेक्षा अधिक गाळप करण्याची आवश्यकता त्यांन व्यक्त केली. रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “पाणी आले तरी पाणी जपून वापरून जमिनीचा पोत कायम राखला जाण्यासाठी प्रयत्न केले जावेत.
पडळचा कारखाना लवकरच नावारूपाला येईल. या भागात कारखानदारीचे जाळे वाढवून या विभागातील शहराकडे जाणारा तरुणांचा लोंढा थांबवण्यासाठी या भागातच कारखानदारी वाढणे गरजेचे आहे.’ प्रभाकर घार्गे म्हणाले, “पडळच्या माळरानावर कारखान्याच्या माध्यमातून औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला. तालुक्यात दुष्काळामुळे राजकीय- सामाजिक पतन झाले आहे, ते दुरुस्त करण्याची शक्ती पवारसाहेबांकडून मिळाली आहे.
आपला मदतीचा हात आमच्या पाठीवर कायम राहू द्या, कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू.” घोरपडे यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या उभारणीचा व सद्यस्थितीचा आढावा घेतला. संचालक नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले. यावेळी प्रदीप विधाते यांनी मनोगत व्यक्त केले.