नगर – कांदा भावाने रडकुंडी आणल्यानंतर आता नगरकर गृहीणीचे बजेट डाळीच्या भावाने कोलमडले आहे. डाळीच्या भावात तब्बल वीस रुपयांची भाववाढ होवून शंभरी गाठली आहे.
ऐन लग्नसराईत डाळी आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. डाळीच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागासह शहरातील कुटुंबात रात्रीच्या जेवणात खिचडी हा आवडता पदार्थ आता कमी होत असल्याचे चित्र आहे. भाववाढीमुळे रोजच्या जेवणातून कांदा हद्दपार झाला आहेच आता खिचडीतून तूरडाळ देखील हद्दपार होताना दिसत आहे.
नगरच्या मार्केटमध्ये डाळीच्या आवक घटल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले. लातूर, नांदेड, परभणी, औरंगाबादेतून नगरच्या मार्केटध्ये डाळीची आवक होते. पण या वर्षी विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाल्याने डाळ पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी उत्पादनात घट झाल्याने किंमती वाढल्याचे सांगण्यात आले. बहुतांश सगळ्याच प्रकारच्या डाळीच्या भावांनी शंभरी गाठली आहे. त्यात आणखी भाववाढ होईल असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. नवीन तूर आणि हरबरा बाजारात विक्रीला येण्याला एक ते दीड महिने बाकी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील साठवलेल्या डाळीचा तुटवडा निर्माण केला असून ही कृत्रिम टंचाई असल्याचे जाणकार सांगतात.