ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव :
औषध फवरणीचाही उपयोग होईना
जिल्हा प्रतिनिधी
पुणे – जिल्ह्यात अवकाळी, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, वादळाचा फटका, लहरी हवामानामुळे अशा विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. आज शेती आणि शेतकरी चारही बाजुंनी संकटात सापडला आहे. “आई जेऊ घालेना अन् बाप भिक मागू देईना’ अशी अवस्थाच शेतकऱ्यांची झाली असून नेमके काय करावे अशा द्विधा मनस्थितीत अडकला आहे. सध्या मध्येच थंडी, मध्येच ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने पदरमोड करून पिकांवर औषध फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने पिके वाचवता वाचवता बळीराजाला “नकीनऊ’ आले आहे.
यंदा जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने खरिपाचे दमदार उत्पन्न निघेल या आनंदात शेतकरी होता; मात्र ऐन पीक काढणीच्यावेळी म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवट व नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला अन् हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिराऊन घेतल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी काळजीवाहू सरकारने केवळ 10 हजार कोटींची घोषणा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचे काम केले असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.
रब्बी हंगामातील कांदा, गहू, ज्वारी, तूर, भाजीपाला पिकांना थंडी ही अत्यंत पोषक असते. दिवाळी झाल्यानंतर थंडीला सुरुवात होते; मात्र यंदा दिवाळीतच जोरदार पाऊस बरसल्याने थंडी पडण्यास पार नोव्हेंबरचा शेवट उजाडला. मात्र, हवी तशी थंडी अद्यापही पडलेली नाही. त्यात यंदा पावसामुळे रब्बी हंगामाची पेरणी उशीरा झाली. यात गहू, हरभरा, कांदा, तूर, ज्वारी, भाजीपाला आदी पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पण या पिकांना गुलाबी थंडीची नितांत आवश्यकता असतानाच गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामतील पिकांवर विविध रोगराईंचा प्रादुर्भाव झाला आहे. या वातावणामुळे तुरीचा फुलोरा गळती होत असून हरभरा व गव्हाचे पिकाही रोगराईच्या कचाट्यात सापडले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
ज्वारीवर पोंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
यंदा पावसामुळे चाऱ्याचे दमदार पीक निघेल व जनावरांसाठीच्या चाऱ्यासाठी किमान वर्षभर तरी काही चिंता नाही, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील ज्वारी, चारा पीक घेतले. मात्र, अवकाळी पवासाने हे पीक वाहून गेल्याने शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले होते. यातूनही न डगमगता शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी पुन्हा रब्बी हंगामत ज्वारीच्या पिकाची पेरणी मोठ्याप्रमाणात केली. मात्र, सध्या थंडीऐवजी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने ज्वारीवर पोंगा पोखरणारी अळी मोठ्या प्रमाणावर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्याला जनावरांच्या चाऱ्याच्या चिंतेने आता ग्रासले आहे. c