नवी दिल्ली : देशातील सध्या करोनाची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएसआयआरच्या एका बैठकीचे नेतृत्व केले. व्हिसीद्वारे मोदी या कार्यक्रमात सामील झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच जगभरातील वैज्ञानिकांच्या खांद्याला खांदा लावत आपल्या वैज्ञानिकांची वाटचाल सुरू असल्याचे म्हणत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
पंतप्रधान मोदींशिवाय या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन सहभागी झाले होते. तसेच प्रतिष्ठित वैज्ञानिक, उद्योगपती आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थितीत होते. यावेळी भारताने वर्षभरातच करोना प्रतिबंधक लस तयार केली आणि जगाला दिली. हे वैज्ञानिकांच्या परिश्रमाचे फळ असल्याचेही मोदी म्हणाले. सीएसआयआर (CSIR) ने आता समाजाशी संवाद साधून, त्यांच्या सल्ल्यांचा विचार करुन काम करायला सुरुवात केली आहे.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, सीएसआयआरबद्दल लोकांना माहिती मिळायला हवी. आपल्या देशातले वैज्ञानिक, संशोधक कशासंदर्भातलं काम करत आहेत, हे त्यांना सोप्या भाषेमध्ये कळायला हवं. त्यामुळे तशी माहिती उपलब्ध करुन देण्याचा सल्ला मी देत आहे.
आपला देश आता सगळ्याच क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. आता आपल्याला योग्य नियोजन करुन आणि निश्चित दिशेने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. करोनामुळे सध्या आपल्या प्रगतीचा वेग मंदावला असला तरीही आत्मनिर्भर भारत हाच आपला संकल्प आहे. वैज्ञानिकांची करोनाकाळातली परिश्रम करुन आत्मनिर्भर होण्याची भूमिका ज्याप्रमाणे आहे, तशीच भूमिका आपल्याला प्रत्येक क्षेत्रात घ्यायची आहे, असंही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी सर्व वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभारही मानले.