नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठे ऑनलाइन सर्च इंजिन गुगलने भारतीयांची माफी मागितली आहे. कंपनीने आपल्या सर्च इंजिनच्या माध्यमातून कन्नड भाषेला भारतातील सर्वात घाणेरडी भाषा म्हटले होते. यानंतर भारतीयांकडून गुगलचा कडवा विरोध झाला.
आता गुगलला आपली चूक लक्षात आली आणि त्याचीच माफी मागण्यात आली आहे. सर्च इंजिन कंपनीने दावा केला, की हे कंपनीचे विचार नसून एक तांत्रिक बिघाड होता. गुगलवर जेव्हा लोकांनी ‘ugliest language in India’ (भारतातील सर्वात घाणेरडी भाषा) असे सर्च केले असता रिझल्टमध्ये ‘कन्नड भाषा’ असे दिसून येत होते. कर्नाटक सरकारने सुद्धा याला तीव्र विरोध केला.
भारतात होणाऱ्या विरोधानंतर अखेर गुगल इंडियाचे प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिले. गुगलच्या सर्च इंजिनमध्ये सापडणाऱ्या अनेक गोष्टी सत्यच असतात असे नाही. अनेकदा इंटरनेटवर विचारलेल्या प्रश्नांची धक्कादायक उत्तरे येतात. हे चुकीचे असल्याचे आम्ही मान्य करतो. तरीही अशा गोष्टींची तक्रार मिळताच ती चूक दुरुस्त केली जाते.
सोबतच, गुगलच्या एल्गोरिदममध्ये आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत. गुगलचे विशिष्ट असे काहीच विचार नाहीत. तरीही गैरसमजुतीने लोकांची मने दुखावली आहेत. त्याबद्दल आम्ही माफी मागतो.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि बंगळुरूचे भाजप खासदार पीसी मोहन यांच्यासह अनेकांनी गुगलच्या या चुकीवर तीव्र आक्षेप नोंदवला. गुगलला ही चूक सुधारून माफी मागायला हवी असे त्यांनी म्हटले. पीसी मोहन यांनी सोशल मीडिया पोस्ट करून कन्नड भाषेचे वैभव आणि इतिहास मांडला.
जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या कन्नड भाषेने अनेक विद्वान घडवले आहेत. तर कर्नाटकचे मंत्री अरविंद लिंबावली यांनी सुद्धा कन्नड भाषेचा इतिहास मांडला. 2500 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या कन्नड भाषेचा अपमान आमचे गौरव कंलकित करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले आहेत.