नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा आडवण्यात आल्याच्या प्रकरणावर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राजकीय कार्यकर्ते आणि राज्यातील पोलिसांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींची फिरोझपूरमधील सभा होऊ दिली नाही असा आरोप शेखावत यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींची ही सभा पंजाबमधील सर्वाधिक गर्दीची सभा ठरली असती असा दावाही त्यांनी केला आहे . पंतप्रधान मोदींची ५ जानेवारी रोजीची ही नियोजित सभा सुरक्षेच्या कारणामुळे रद्द करण्यात आली होती असे शेखावत म्हणाले. याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
“फिरोझपूरमधील सभा ही पंजाबमधील सर्वाधिक गर्दी पहायला मिळाली असती. ही सभा सर्वाधिक गर्दी झालेली सभा ठरली असती. मात्र राजकीय कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने सभा होऊ न देण्याबरोबरच पंतप्रधान मोदींनाही सभेच्या ठिकाणी येण्यापासून रोखलं. मात्र यामुळे आम्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांचा निश्चय आणखीन दृढ झाला आहे,” असे शेखावत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे रणदीप सिंह सुरजेवाला, नवज्योत सिंग सिद्धू, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी फिरोझपूरमधील सभास्थळी पोहचले असते तरी त्यांना रिकाम्या खुर्च्यांसमोरच भाषण द्यावं लागलं असतं, असे म्हटले होते.
फिरोझपूरमधील सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनीही हजारो खुर्चा ठेवण्यात आलेल्या पण सभेला लोक नव्हती असा चिमटा या प्रकरणावरुन बोलताना काढला होता. त्याच पार्श्वभूमीवर शेखावत यांनी हे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, मंगळवारी दिल्लीमधील भाजपाच्या मुख्य कार्यालयामध्ये पंजाबमधील काही नेत्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेस केला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात शेखावत बोलत होते. काँग्रेसचे आमदार अरविंद खन्ना, शिरोमणी अकाली दलचे गुरदीप सिंग गोशाआणि अमृतसरमधील धरमवीर सारीन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री दरदीप सिंग पुरीसुद्धा उपस्थित होते.