वैष्णवी कदम
नगर – मान्सून लांबल्याने भाजीपाल्यावर त्यांचा परिणाम झाला असून भाज्यांची आवक मंदावल्याने सहाजिकच भाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांच्या दररोजच्या जेवणातून काही भाज्या तर दरवाढीमुळे हद्दपार झाल्याचे दिसत आहे. मागील काही महिन्यात भाव नसल्याने रस्त्यावर फेकण्यात आलेल्या टोमॅटो आज 35 ते 40 रुपये किलो झाला आहे.
मान्सूनचे आगमन लांबल्याने खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. पाऊस लांबल्याने आता शेतमालाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात महागला आहे. तर दुसरीकडे आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा मात्र पावसाचे लवकर आगमन होण्याची वाट पाहत आहे. शहरात भाजीपाल्याची आवक कमी झाली असून भाजीपाला महागला आहे.
सध्या तरी सरासरी भाज्यांच्या दरामध्ये किमान 15 ते 20 रुपये तर काही भाज्यांमध्ये 50 ते 60 रुपये दरवाढ झाली आहे. त्यातच बदलत्या हवामानाचे भाजीपाल्यावर विपरीत परिणाम होऊन उत्पादन कमी निघाल्याने बाजारातील आवक घटली आहे. यामुळे ठोक बाजारात भाजीपाला वधारला आहे. किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीर 30 ते 40 रुपये जूडी तर मिरची 60 ते 80 रुपये किलो, इतर फळभाज्या 50 ते 60 रुपये किलो या दराने विकल्या जात आहे.
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले भाव (क्विंटलमध्ये)
टोमॅटो – 2500 – 3000, बटाटे-1800-2100, काकडी, 2000 – 2500, भेंडी- 3000 – 3500, घेवडा- 10, 000 – 12000, कैरी- 3000 – 4000, वांगी- 2500-3000, फ्लॉवर- 2500-3000, कोबी- 1000-1200, गवार- 4400-5000, घोसाळी- 2500-3000, दोडका- 4400-5000, कारली- 4400- 5000, मिरची- 6500 – 7000, लिंबू- 2500-3000, शिमला – 3500- 4000
कांद्याच्या दरात सुधारणा
मागील काही दिवसांपासून कांद्याच्या घसरलेल्या दराने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत केली आहे. कांद्याच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. एकीकडे कोसळते बाजारभाव तर दुसरीकडे कांदा काढणीवेळी अवकाळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाला. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मात्र रविवारी कांद्याला 150 ते 1500 असे दर मिळाल्याने काही आशा निर्माण झाली आहे. रविवारी बाजार समितीत एकूण 149 ट्रक कांद्याची आवक झाली. यातील नंबर 1 कांदा 1200 ते 1500, 2 नंबर – 1000 ते 1200, 3 नंबर 500 ते 1000, 300 ते 600 रुपये दर मिळाले.