लातूर – गेल्या वर्षी झालेली अनियमित पाऊसमान आणि यावर्षी दिलेली पावसाने ओढ याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाला आहे. राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे सर्वच खाद्य वस्तूंची भाव वाढताना दिसत आहेत. डाळीने तर रोज दराचा उच्चांक गाठण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची अत्यल्प आवक आहे.
मागील काही दिवसात सातत्याने तुरीचे भाव वाढत आहेत. त्यामुळे बारा हजार रुपये क्विंटलने गुरुवारी तुरीची बाजारात खरेदी झाली आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून बाजारात ज्यावेळेस तुरडाळ येते त्यावेळेस त्याचेही भाव वाढताना दिसत आहेत. सध्या किरकोळ बाजारात तुरडाळीचा भाव हा 175 रुपये किलो आहे. ऐन सणासुदीत तूरडाळ महाग झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 175 रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी 20 ते 30 रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी झालेले कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढ्या दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. तूरडाळ दोन महिन्यांत 100 ते 110 रुपयांवरुन 160 ते 170 रुपयांवर गेली आहे. हरभरा डाळ 57 ते 58 रुपयांवरून 70 रुपये प्रति किलोवर गेली आहे. उडीद डाळ 90 रुपयांवरून 110 रुपये प्रतिकिलो झाली असून, मसूर डाळीतही किलोमागे दहा-बारा रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मूग डाळ 80 ते 85 रुपयांवरुन 110 रुपयांवर गेली आहे.
गेल्या वर्षी 25 ऑगस्टअखेर देशात 128.07 लाख हेक्टरवर कडधान्यांची लागवड झाली होती. यंदा ती 117.44 लाख हेक्टरवर घसरली आहे. तुरीची लागवड 42.11 लाख हेक्टर, उडीद 31.10 लाख हेक्टर, मूग 30.64 लाख हेक्टर, कुळीथ 0.26 लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची 13.34 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवडीत घट झाल्यामुळे पुढील वर्षभर डाळींचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
किरकोळ व्यापारी हैराण
तूरडाळ, मूगडाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ याचे भाव दर दोन दिवसांनी बदलत असल्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात माल विकतही नाही आणि किरकोळ व्यापारी खरेदी करताना प्रचंड ताणात आहे. रोज बदलणाऱ्या भावामुळे ग्राहकांवरही त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे.
गेल्या वर्षी कमी झालेली डाळीची लागवड अनियमित पाऊसमान याचा डाळीचे उत्पादनावर झालेला परिणाम आणि यावर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातही पावसाने दिलेली ओढ याचा थेट परिणाम शेतमाल उत्पादनावर झाला आहे. यामुळे संपूर्ण देशांमध्येच डाळीचे उत्पादन यावर्षी कमी प्रमाणात आहे. याचा थेट परिणाम बाजारातील भाव वाढीवर झाला आहे. पाऊस पडेल आणि उत्पादन चांगले येईल अशी स्थिती आता राहिली नाही.