आवक घटल्याने भाव वधारले
सातारा – राज्यातील कांदा उत्पादित क्षेत्रातील बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे, तर काही भागात पाऊसच न पडल्यामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
साताऱ्यात त्यामुळे कांद्याचा भाव 75 रुपयापर्यंत पोहचला आहे. किरकोळ बाजारात कांदा 55 ते 60 रुपयांवर पोचला आहे. लोणंदच्या कांदा मार्केटमध्येसुध्दा जुना कांदा संपत आल्याने कांद्याची साताऱ्यात होणारी आवक घटली आहे. नाशिक, लासलगाव सटाणा, घोटी खेड येथून दरवर्षी 4300 ते 4400 पिशव्यांची आवक होते. मात्र यंदा कांद्याला अतिवृष्टीने फटका दिल्याने ही आवक एकदम 1900 पिशव्यावर आली आहे.
राज्यातील आणि देशातील कांदा उत्पादित भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा भिजून त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर नवीन कांद्याची होणारी लागवड देखील धोक्यात आली आहे. सद्यःस्थितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे जुन्या कांद्याचा साठा शिल्लक आहे. तोही काही प्रमाणातच आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागणी जास्त आणि आवक कमी यामुळे भाव वाढत आहेत. प्रतिदहा किलोस गुरुवारी घाऊक बाजारात 350 ते 400 रुपये कांद्याला भाव मिळाला. आठवड्यात सरासरी 50 ते 60 ट्रक इतकी दररोज आवक होत असल्याची माहिती किरकोळ विक्रेते प्रकाश घोरपडे यांनी दिली.
राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातील साठवून ठेवलेला कांदा जवळपास संपत आला आहे. तसेच आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात देखील नवीन कांद्याची तुरळक आवक होत आहे. त्यामुळे सगळीकडूनच मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसघशीत वाढ होत आहे. कांदा व्यापारी संदेश महाडिक म्हणाले, “जुना कांदा वखारीत ठेवून जवळपास सहा महिने झाले असल्यामुळे सद्यःस्थितीत खराब कांद्याचे प्रमाण वाढलेले आहे. दर्जेदार कांद्याची आवक कमी होत आहे. तसेच या कांद्याला परराज्यांतून मागणी वाढली आहे. राज्यामध्ये अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याचे पीक धोक्यात आले आहे.’