पुणे -घराबाहेर पडताना नागरिकांनी नाका-तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे; परंतु “मला काय होत नाही’, अश्या अविर्भावात परिसरात वावरणाऱ्यांमुळेच ग्रामीण भागात करोनाचा प्रसार वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वारंवार मास्क लावण्याबाबत आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही न ऐकणाऱ्यांचे “तोंड बंद’ करण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
मागील आठवड्याभरात मास्क न वापरणाऱ्या तब्बल 1 हजार 519 व्यक्तींवर कारवाई करत 4 लाख 89 हजार 376 रुपयांचा दंड वसूल केला. त्यामध्ये जुन्नर, शिरूर, दौंड आणि बारामतीमध्ये सर्वाधिक व्यक्तींचा समावेश आहे.
करोना महामारीत बहुतांश नागरिक भीतीपोटी का होईना परंतु तोंडाला मास्क, हॅन्डग्लोव्हज आणि चष्मा वापरतात; परंतु काही बहाद्दर मास्क न लावताच गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी फिरतात. त्यामुळे प्रसार वाढण्याची भीती नाकारता येत नाही.
कारवाई केलेल्या व्यक्ती आणि जमा दंड
आंबेगाव तालुक्यात 60 व्यक्तींकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. शिवाय, बारामतीतीत 239 व्यक्तींकडून 64 हजार 750, भोर 31 व्यक्तींकडून 15 हजार 500, दौंड 279 व्यक्तींकडून 75 हजार 800, हवेली 128 व्यक्तींकडून 4 हजार 96, इंदापूर 59 व्यक्तींकडून 32 हजार 200, जुन्नर 343 व्यक्तींकडून 78 हजार 630, खेड 7 व्यक्तींकडून 3 हजार 500, मावळ 11 व्यक्तींकडून 5 हजार 500, मुळशी 102 व्यक्तींकडून 51 हजार, पुरंदर 31 व्यक्तींकडून 15 हजार 500, शिरूर 141 व्यक्तींकडून 68 हजार 900, वेल्हे 88 व्यक्तींकडून 44 हजार रुपये दंड वसूल केला.