रांची -भाजपविरोधी आघाडी उभारण्याचा प्रयत्न म्हणून माझ्या भेटीगाठींकडे पाहिले जाऊ नये. लवकरच चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत कुठला निष्कर्ष काढू नका, अशी भूमिका केसीआर नावाने ओळखले जाणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी मांडली.
केसीआर यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे केसीआर भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. अशात त्यांनी येथे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली.
त्या भेटीनंतर केसीआर पत्रकारांशी बोलत होते. मागील 75 वर्षांत देशात अपेक्षित विकास झालेला नाही. त्यामुळे देशाला नवी दिशा देण्याची गरज आहे. त्यासाठी नवे काही तरी करण्याची गरज आहे.
त्यासाठी मी समविचारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय राजकारणात भूमिका निभावण्यास केसीआर सरसावल्याचे मानले जात आहे. त्यातून ते प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत.