मोहाली – भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली कारकिर्दीतील शंभरावी कसोटी खेळताना 45 धावांवर बाद झाला. तो आपल्या शंभराव्या कसोटीत किती धावा करणार आणि कोणता गोलंदाज त्याला बाद करणार, याबाबत एका चाहत्याने बारा तासांपूर्वी म्हणजेच सामना सुरू होण्यापूर्वीच ट्विटरवर एक भाकित केले होते. ते तंतोतंत खरे ठरल्याने आता ही खेळी फिक्स होती का, या चर्चांना उधाण आले आहे.
या कसोटीत पहिल्या डावात कोहली आपल्या शंभराव्या कसोटीत देदीप्यमान खेळी करण्यासाठी मैदानात उतरला. त्याने 45 धावांची खेळीही केली. मात्र, तो लसिथ एम्बुलडेनियाच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्याने 76 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने ही खेळी करताना जेव्हा 38वी धाव घेतली तेव्हा त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 8 हजार धावांचा पल्लाही पार केला. मात्र, कोहली शंभराव्या कसोटीत शतक तर दूरच अर्धशतकही साकार करता आले नाही.
तो 45 धावांवर एम्बुलडेनियाच्या गोलंदाजीवर बाद होईल, असे भाकित एका चाहत्याने ट्विटर या सोशल मीडिया प्लॉफॉर्मवर व्यक्त केले होते. हे भाकित त्याने भारताची फलंदाजी सुरू होण्यापूर्वी तब्बल बारा तास आधी व्यक्त केले होते. अन् अगदी तसेच घडले. कोहली याच गोलंदाजाच्या गोलंदाजीवर 45 धावांवरच बाद झाला. यामुळे आता फिक्सिंगच्या चर्चेला उधाण आले.
अर्थात या चर्चांना अर्थ नसल्याचे सांगितले जात असून हे ट्विट उशिरा पोस्ट झाले असावे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असावा, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, असे असले तरीही हे भाकित इतके तंतोतंत खरे कसे ठरले ही चर्चा सर्वत्र सुरू आहे.