पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दुरंगी लढतीसाठी प्रयत्न सुरू आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससह महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आज (दि.10) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रयत्नांना यश येते की राहुल कलाटे आपल्या भूमिकेवर ठाम राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून कै. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून 8 जण उमेवारीसाठी इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक नाना काटे आणि ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक राहूल कलाटे यांच्यातच उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (दि. 6) फेब्रुवारी रोजी स्वतः शहरात येऊन इच्छुकांशी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. 7) सकाळी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याच्या निर्णय घेतला. कलाटे यांनी अर्ज भरू नये, यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोटनिवडणूक लढविण्याबाबत कलाटे यांनी आपण ठाम असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल झाल्यानंतर जगताप, काटे, कलाटे यांनी प्रचारही सुरू केला. त्यामुळे पोटनिवडणूक जगताप-काटे-कलाटे अशी तिरंगी होणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे. मात्र, तिरंगी लढत झाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कलाटे यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. आज (दि. 10) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कलाटे हे कोणता निर्णय घेतात त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे करताहेत मध्यस्थी
पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाल्यास राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना फटका बसून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच राहुल कलाटे यांचे शिवसेनेतील जुने सहकारी असलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या माध्यमातून कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी बैठकाही झाल्याची माहिती समोर आली आहे.
…तर कलाटे यांच्या पराभवाची हॅटट्रिक
पोटनिवडणूक असल्याने मतदान कमी होण्याची शक्यता आहे. तिरंगी लढत झाल्यास जगताप, काटे आणि कलाटे यांच्या मतांची विभागणी होईल. याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला होण्याची शक्यता जास्त आहे. कलाटे यांनी शिवसेनेकडून 2014 मध्ये तर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, वंचितच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून विधानसभा लढविली. त्यामुळे त्यांना 1 लाख 12 हजार मते मिळाली. आता कोणत्याच राजकीय पक्षाचा पाठिंबा नसताना अपक्ष म्हणून निवडणूक लढविणे कलाटे यांच्यासाठी मोठी रिस्क असून शकते. कलाटे यांनी रिस्क घेऊन उमेदवारी अर्ज कायम ठेवून निवडणूक लढविली आणि यामध्ये त्यांचा पराभव झाल्यास पराभवाची हॅटट्रिक होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढविली जाईल.