पुणे – बारामती लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत (दि.22) आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीनंतर बारामती लोकसभेसाठी किती उमेदवार रिंगणात आहे, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 51 उमेदवारांनी अर्ज भरले. शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. या छाननीमध्ये पाच उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. अर्ज बाद झालेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. पवार यांनी डमी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी अर्जासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नव्हता. त्यामुळे पवार यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला.
…तर दोन बॅलेट युनिट वापरावे लागणार
ईव्हीएमवरील बॅलेट युनिटवर 16 उमेदवारांसाठीच बटणांची मर्यादा आहे. एक बटण हे “नोटा’ मताचे असते. त्यामुळे 15 उमेदवार रिंगणात असतील, तर एकच बॅलेट युनिट वापरावे लागेल. जर 15 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले, तर दोन बॅलेट युनिट वापरावे लागणार आहे.