पाथर्डी, (प्रतिनिधी) : ओबीसी आरक्षणाला धक्का ही लागू देणार नाही, असे एकीकडे शासन सागंत आहे. मात्र, दुसरीकडे झुंडशाहीला घाबरून सरकार कुठलेही निर्णय घेत आहे . शासनाच्या निर्णयामुळे प्रत्यक्षात ओबीसी आरक्षणाला धक्का लागत आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज पेटून उठला आहे, त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घ्यावा. ओबीसी समाजावर अन्याय करू नये अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ओबीसी नेते दिलीपराव खेडकर यांनी दिला.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, यासाठी खरवंडी कासार बाजारपेठ बंद ठेऊन किर्तनवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग ६१ वर ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना महसूल विभागामधील वरिष्ठ अधिकारी सामोरे न आल्याने आंदोलक आक्रमक होत त्यांनी रस्त्यावर टायर जाळून शासनाचा निषेध व्यक्त केला.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उषोषण करून आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे यांच्या मातोरी या मूळ गावापासून दहा किमी अंतरावर असलेल्या किर्तनवाडी येथे गेल्या नऊ दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये व सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी प्रल्हाद किर्तने हे उपोषणास बसले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज खरवंडी कासार बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. किर्तनवाडी येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्याच्या भावना समजून घेण्यासाठी अधिकारी उपस्थित न राहिल्याने संतप्त आंदोलकांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे महामार्ग चक्काजाम झाला होता.दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी ओबीसी चळवळीचे मुख्य संयोजक दिलीपराव खेडकर, ओबीसी नेते बाळासाहेब सानप, समता परिषदेचे रमेश गोरे, गोकुळ दौंड ,सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड , नागनाथ गर्जे, महारुद्र किर्तने, सुनिल पाखरे, विनोद वाघ, माणिक खेडकर, आजीनाथ दराडे, किरण खेडकर, बाळासाहेब बटुळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, लहु दराडे, वामन किर्तने, माणिक बटुळे, महेश हजारे, अंबादास राऊत यांच्यासह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. या अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड, शिरूर, गेवराइ, शेवगाव तालुक्यातून अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते.
महसूलचे वरिष्ठ अधिकारी आंदोलकाला सामोरे न आल्याने दुपारी बारापर्यंत आंदोलन झाल्याने प्रवाश्यांचे हाल झाले, आंदोलक ही आक्रमक झाले. प्रांताधिकारी प्रशांत मते यांनी मोबाईलवरून आंदोलकांशी चर्चा केली. मी निवडणूक आयोगाची बैठक असल्याने येऊ शकलो नाही, आपल्या भावना आम्ही वरिष्ठ पातळीवर कळवू, असे आश्वासित केल्याने नायब तहसीलदार बागल यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. त्यामहे रास्ता रोको आंदोलन स्थगित झाले मात्र किर्तने यांचे उपोषण चालूच आहेत. शासनाने ओबीसी समाजाच्या विरोधात अधिवेशनात निर्णय घेऊ नये, अन्यथा महाराष्ट्रातील ओबीसी समाज पेटून उठेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.