मुंबई – उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली, त्यांच्या चिन्हाची आणि नावाची चोरी झाली, पण बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, आणि उद्धव ठाकरे हे त्या वाघाचे सुपुत्र आहेत, त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्या मागे असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले. तसेच सर्वोच्च न्यायालय ठाकरेंना न्याय देईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ठाकरे यांनी मुख्यमंत्री केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. या भेटीनंतर केजरीवाल बोलत होते.
भाजपला गुंडगिरीशिवाय काही येत नाही, यामुळे देश पुढे जाणार नाही. दिल्लीतील जनतेने आम्हाला बहुमत दिले, तरीही दिल्लीत महापौर बसवायला आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले असे केजरीवाल म्हणाले. या देशात एकच पक्ष आहे जो 24 तास निवडणुकीबद्दल विचार करतो, असे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. आम्ही देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर विचार करतो असेही ते पुढे म्हणाले.
आम्ही “ईडी’ला घाबरत नाही
“ईडी’ आणि सीबीआयचा वापर हे भित्रे लोक करतात. भाजपवाले ज्या लोकांना घाबरतात त्यांच्याविरोधात या तपास यंत्रणांचा वापर केला जातोय. आम्ही काही केले नाही, त्यामुळे आम्ही घाबरत नाही, शेवटी सत्याचाच विजय होणार, असेही केजरीवाल यांनी यावेळी म्हटले.
पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत दिल्लीचे मुख्यमंत्री मा.श्री. अरविंद केजरीवाल यांची संयुक्त पत्रकार परिषद ⤵️
📍मातोश्री – LIVE#UddhavThackeray @ArvindKejriwal #MUMBAI #PC #MAHARASHTRA
🟨FRIDAY-2️⃣4️⃣-0️⃣2️⃣-2️⃣0️⃣2️⃣3️⃣🟨 https://t.co/HG839wUpnt
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 24, 2023
करोनातील ठाकरेंचे काम कौतुकास्पद
करोना काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारे काम केले ते कौतुकास्पद आहे. कोरोना काळात महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक कामांची दिल्लीमध्ये आम्ही अंमलबजावणी केली. आज लोकांना नोकऱ्या नाहीत, युवक बेरोजगार आहेत, याचवेळी देशातील महागाई वाढत आहे. एलआयसीसारखी कंपनी तोट्यात जात आहे. देशातील काही उद्योगपतींना फायदा करुन देण्यासाठी केंद्र सरकार देशाला विकायला निघालेय असाही घणाघात केजरीवालांनी केंद्र सरकारवर केला.