वाढता खर्च, यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचा ट्रेंड बदलला
शेरखान शेख
शिक्रापूर- शेतकऱ्यांचा आवडते खिलार जातीचे गाय आणि बैल, गाय हे सर्वात रुबाबदार दिसणारी जात आहे. सध्या जर्सी गायीचा ट्रेंड, यांत्रिकीकरण आणि वाढता पालनपोषणाचा खर्च आदी कारणांमुळे देशी खिलार बैल व गाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही जात कालबाह्य होत असल्याचे दिसून येत आहे.
40 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्यात आवर्जून देशी खिलार गाय आणि बैल असायचे. मात्र, अलीकडील काळामध्ये विदेशी जर्सी गायींनी याची जागा घेतली आहे. कमी कालावधीत जादा दुध देणाऱ्या जर्सी गाय पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खिलार गायांची संख्या कमी होत आहे. त्याला कारण म्हणजे त्यांच्यापासून प्रजनन होणारे वासरे हे बैलगाडा शर्यतीला वापरले जातात.
शेतकऱ्यांच्या आवडत्या बैलगाडा शर्यतीवर बंदी लादल्यामुळे खिलार गायींच्या प्रमाणात मोठी घट होत आहे. अजूनही काही शेतकरी आजही खिलार गायीचा सांभाळ करीत आहेत. देशी गायच्या दुधाला ऐंशी ते शंभर रुपये असा उच्चांक भाव मिळू लागला आहे. अनेक ठिकाणी देशी व खिलार गायांना महत्व प्राप्त होत आहे. परंतु बाजारामध्ये खिलार गाय दुर्मिळ होत आहेत. परंतु शासनाने दुर्मिळ होत असलेल्या खिलार गाय जोपसण्यासाठी काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज आहे.
देशी गायींच्या वासरांना उच्चांकी भाव
देशी खिलार गायांच्या वासरांना बैल असल्यास त्यांचा वापर शेती व बैलगाडा शर्यतीसाठी होत आहे. खिलार गायीच्या वासराला पंचवीस हजार ते एक लाख रुपये भाव मिळत आहे. देशी गायांच्या वासरांना उच्चांकी भाव मिळत आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानाही शेतकरी खिलार बैल व गायींचा सांभाळ करीत आहे.