नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतीक्षा आता जवळपास संपत आली आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातील दिशा ठरवणार आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आता केवळ चार ते पाच तारखाच उरल्या आहेत. 8 ते 12 मे या काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पण सध्या कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु असून 10 मे रोजी मतदान आहे.
महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा असेल. त्यामुळे हा निकाल कर्नाटकच्या मतदानानंतर येतो का याची उत्सुकता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाने 16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आपला निकाल राखून ठेवला आहे.
ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ होते. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे स्पष्ट आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. 13 आणि 14 मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे 8 ते 12 याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे.
सर्वोच्च न्यायालय एखाद्या प्रकरणाचा निकाल देणार, हे आदल्या दिवशीच जाहीर केले जाते. न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी निकालाची ही तारीख येते. त्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्ष प्रकरणाचा निकाल लागेल तेव्हा एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल. ही तारीख नेमकी काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दुसरीकडे, 20 मे पासून सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्याही सुरु होत आहेत.
दोन निकाल प्रलंबित –
20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगले, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधील अधिकारांच्या वादाचा.. दिल्ली केंद्र सरकारचे प्रकरण आपल्या आधीच पूर्ण झाले आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे हे दोन्ही निकाल एकाच दिवशी येतात का हेही पाहावे लागेल.