मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल रायगड पोलिसांनी मुंबई येथून अटक केली. इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून अलिबाग न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर देशभरातील भाजप नेते ठाकरे सरकारवर कडाडून टीका करत आहेत. अशातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाबाबत खळबळजनक आरोप केलाय.
राणे यांनी याबाबत आपल्या ट्विटर खात्यावरून भाष्य करताना, ‘अन्वय नाईक यांनी पैशांसाठी आत्महत्या केली असेल असं वाटत नाही. याबाबत अलिबागमध्ये चौकशी केली असता त्यांची परिस्थिती इतकीही वाईट नव्हती असं समजलं. काही लोकांनी तर ही आत्महत्या नसल्याचं म्हंटलंय. सत्य बाहेर पडेलच’ असा संदेश दिला आहे.
स्व. अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत न्हवतं म्हणून अलिबाग मध्ये माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली ते करणं पैसे होऊ शकत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे ती आत्महत्या नाही. सत्य बाहेर पडेलंच.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 5, 2020
सत्ताधाऱ्यांना इशारा
राणे यांनी अर्णब गोस्वामींना अटक केल्याप्रकरणी राज्य सरकारला गंभीर इशारा देत, “खुनशी राजकारणाची दुसरी बाजू पण तितकीच भयानक असते हे आताच्या सत्ताधाऱ्यांनी विसरू नये. कसलीही परवानगी नसताना एका सीनियर पत्रकारावर जी कारवाई करण्यात आली ती द्वेषातून होती, कायद्याला धरून न्हवती हे स्पष्ट झालं.” असं ट्विट केलं आहे.
शिवसेनेवरही निशाणा
राणे यांनी यावेळी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाईक यांच्याबाबत शिवसेनेने घेतलेली भूमिका सोयीचे राजकारण असल्याचा आरोप करत त्यांनी, ‘किती मराठी माणसांना रुग्णालयांची बिलं भरता आली नाही म्हणून जीव गमवावा लागला. किती तरुण बेरोजगार झाले. मुंबईत मराठी माणसांचा आकडा १८-१९ टक्के इतका खालावला. मात्र नेहमीप्रमाणे शिवसेनेला फक्त सोयीचा अलिबागचा मराठी माणूस दिसतो बहुसंख्य मराठी दिसत नाहीत.’ असा संदेश दिला.
मराठी माणूस कोरोना आजारा मूळे बिल भरू शकला नाही म्हणून किती मराठी माणसांना जीव गमवावे लागले? लॉकडाऊन मध्ये लाखो मराठी तरुण बेरोजगार झाले, मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८/१९ % झाली, पण नेहमीप्रमाणे सोईचा अलिबागचा मराठी माणूस शिवसेनेला दिसतो पण बहुसंख्य मराठी माणसं दिसत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 5, 2020
नाईकांनी मृत्यपूर्व चिट्ठीत काय लिहलंय?
अर्णव गोस्वामी यांनी 83 लाख रुपये थकवल्याने आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात आली असून त्या चिठ्ठीत या साऱ्या प्रकरणाचा तपशिलाने नोंद करण्यात आली आहे.
त्यात चिठ्ठीत अन्वय नाईक यांनी म्हटले आहे की आम्ही खालील कारणामुळे आत्महत्या करीत आहोत. मी अन्वय नाईक आणि माझ्या मातोश्री कुमुद नाईक आम्ही दोघेही आमच्या कंपनीचे संचालक आहोत. खाली नाव नमूद केलेल्या व्यक्तींनी आमचे पैसे बुडवले आहेत.
1. अर्णव गोस्वामी, हे रिपब्लीक टीव्हीचे प्रमुख असून त्यांनी आमचे 83 लाख रुपये थकवले आहेत. त्यांच्या बॉम्बे डाईंग स्टुडिओचे काम आम्ही केले आहे.
2. स्की मीडियाचे फिरोज शेख. त्यांच्या अंधेरीतील आयडिया स्क्वेअर प्रकल्पातील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे काम आम्ही केले त्याचे चारशे लाख रुपये त्यांच्याकडून येणे आहे.
3. स्मार्ट वर्क कंपनीचे मालक नितेश सारडा यांच्याकडेही आमचे 55 लाख रुपये पेंडिंग आहेत. या तिघांकडून हे पैसे वसूल करा आणि त्यांनाच आमच्या मृत्यूबद्दल जबाबदार धरा, असे अन्वय नाईक यांनी आपल्या मृत्युपूर्व नोंदीत स्पष्टपणे नमूद केले आहे.