नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे सर्व व्यापारी, व्यवसायिकांसह सामान्य नागरिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्ज घेतलेल्या ग्राहकांना व्याजावरील व्याज (मोरॅटोरियम) देण्याचा निर्णय घेतला. या योजनेची सुरुवात आजपासून होणार आहे.
दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या ग्राहकांना बॅंका व्याजावरील व्याज खात्यावर जमा करणार आहेत. ज्या ग्राहकांनी या काळात कर्जाचे हप्ते वेळेवर भरले आहेत, अशांना व्याजावरील व्याजाची रक्कम मिळणार आहे. बॅंकांना ही रक्कम नंतर केंद्र सरकार देणार आहे.
व्याज माफ करण्याची गरज असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर केंद्र सरकारने चक्रवाढ व्याज ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे सांगितले आहे. यानुसार बॅंका चक्रवाढव्याज ग्राहकांच्या खात्यात जमा करीत आहेत. दरम्यान, हे प्रकरण अद्यापही न्यायालयात असून आज या विषयावर सुनावणी होणार आहे.
कोणाला लाभ होणार?
ज्या बॅंक ग्राहकांनी दोन कोटीपर्यंत कर्ज घेतलेले आहे त्यांना या योजनेचा लाभ होईल. संबंधित खाते 29 फेब्रुवारीपर्यंत अनुत्पादित मालमत्ता नसले पाहिजे व वेळेवर हप्ते दिलेले असले पाहिजेत. घरासाठीचे कर्ज, शिक्षणासाठीचे कर्ज, क्रेडिट कार्डवरील थकबाकी, वाहन कर्ज, ग्राहकोपयोगी वस्तू, लघु उद्योगासाठी घेतलेले कर्ज इत्यादी या योजनेसाठी पात्र आहेत. लॉकडाउनच्या काळात ज्यांनी सर्व किंवा काही हप्ते दिलेले नाहीत अशी खातीही या योजनेसाठी पात्र आहेत.