पुणे -राज्यात गोवर या विषाणूच्या संसर्गजन्य आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील चार वर्षाच्या तुलने यावर्षी (2022) गोवर रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत राज्यात गोवरची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 823 वर पोहचली आहे, यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये 386 इतके आहेत.
राज्यात गोवरचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने ठोस पावले उचलली आहेत. राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केली असून लसीकरण आणि सर्वेक्षणावर अधिक भर दिला जात आहे. यामध्ये गोवर प्रभावीत भागात एकूण 1 हजार 184 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. त्यामध्ये 12 लाख 58 हजार 780 घरांचे सर्वेक्षण करून 30 हजार 769 बालकांना व्हिटॅनिम ए डोस देण्यात आला. तर 11 हजार 521 बालकांना गोवर रूबेलाचा पहिला तर 8 हजार 276 बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
गोवर हा संसर्गजन्य आजार असून लसीकरणामुळे तो टाळता येणारा आजार आहे. हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. त्यामुळे 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील मुंबईमध्ये गोवरचे रुग्ण अधिक सापडले असून त्यानंतर मालेगाव, भिवंडी, ठाणे, वसई, विरार, पनवेल, नवी मुंबई यासह मीरा भाईंदर, बुलढाणा, रायगड, औरंगाबाद आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत रुग्ण सापडले आहेत. गोवरमुळे आतापर्यंत 18 बालकांचा मृत्यू झाला असून, त्यातील केवळ एका बालकाने गोवर लसीचा एक डोस घेतला होता. तर अन्य बालकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता, त्यामुळे लसीकरण महत्वाचे आहे