शिर्डी -देशात दुसऱ्या क्रमांकाचे तर राज्यात प्रथम क्रमांकाचे साई संस्थान हे सर्वात श्रीमंत तीर्थस्थान आहे. मात्र, काही दिवसांपासून हा स्तर खालवत चालला आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा रोडावली आहे. अर्थात याची कारणे वेगवेगळी असली तरी प्रशासकीय कारभार आणि त्यांनी घेतलेले निर्णय व त्याची कासव गतीने होणारी अंमलबजावणी हे मुख्य कारण आहे.
साई संस्थान हे धार्मिक तीर्थक्षेत्र असले तरी येथे राजकीय मक्तेदारी कायम आहे. त्यातच गेली एक वर्षांपासून अद्यावत अशी दर्शनरांग इमारत तयार असून सुद्धा केवळ पंतप्रधानांच्या हस्तेच त्याचे उद्घाटन करण्याचा पालकमंत्र्यांच्या हट्टाहास आता भाविकांच्या लक्षात आल्याने याविषयीचा मोठा नाराजीचा सूर देशभरातून उमटू लागला आहे.
भाविकांच्या कोट्यवधी रुपयांच्या मिळणाऱ्या देणगीतून साई संस्थानचा सर्व कारभार चालतो. त्यांच्या देणगीच्या जीवावरच हे संस्थान राज्यातील सर्वात श्रीमंत तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था असूनही भाविकांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या, पाकीटमारी, पूजेच्या साहित्याच्या नावाखाली फसवणूक, दर्शन व आरती पासेसचा काळाबाजार, गेटवर एजंटाच्या टोळीचा गराडा व त्यांच्यामार्फत भाविकांची फसवणूक व लुटीचे प्रकार सर्रास सुरू आहे. मात्र, बाबांचा पैशातून आपला पगार चालू आहे, त्यामुळे या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केलं जातं आहे.
प्रशासकीय कामकाजात अनेक विभागात चोऱ्या, देणगी कार्यालयातील भ्रष्टाचार, पेडपासचा काळाबाजार यामुळे साई संस्थानची देशात मोठी बदनामी झाली असून त्यावर ठोस निर्णय घेऊन भाविकांना सुरक्षित व आनंदात दर्शन मिळणे अपेक्षित असताना फक्त तात्पुरते कडक धोरण अवलंबून मलमपट्टी करण्याचे काम साई संस्थान प्रशासन करत असल्याचा आरोप खुद्द माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी केल्याने साई संस्थान प्रशासनाच्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. सध्या येथील सर्व कारभार त्रिसदस्यीय समितीच्या अधिपत्याखाली सुरू असून यात जिल्हा प्रधान न्यायाधीश, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी असून सुद्धा संस्थानेच अधिकारी व कर्मचारी बिनधास्त आहेत.शिर्डीत भाविकांची गर्दी कमी होत असून त्याचा परिणाम देणगीवर व व्यावसायिकांच्या अर्थकारणावर पडत आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून भाविकांसाठी उभारलेली दर्शन रांगेची इमारत व शैक्षणिक संकुल केवळ उद्घाटनाअभावी धूळखात पडली असेल तर त्याला जबाबदार नेमकी कोण? याचा खुलासा साई संस्थान त्रिसदस्यीय समितीने करावा.
डॉ. एकनाथ गोंदकर, माजी विश्वस्त, शिर्डी