पुणे : एल्गार परिषद आणि बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( एनआयए) मुंबईतील एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोपींवर देशद्रोहाचे कलम लावण्यात आलेले नाही.
या एफआयआरमध्ये एकूण 11 जणांची नावं असून त्यापैकी नऊ जण सध्या तुरुंगात आहेत. या सर्वजणांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायददा (यूएपीए) आणि भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, एनआयएच्या नव्या एफआयआरमध्ये संशयितांविरोधात देशद्रोहाचं कलमच लावण्यात आलेले नाही.
पूर्वी येथे दाखल असलेल्या एफआयाअरमध्ये भादंवी कलमाच्या 124 ए (देशद्रोह) नुसार गुन्हा दाखल आहे. यामध्ये नऊ जणांच्या विरोधात तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे
या प्रकरणातील काही आरोपींना नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर सर्व आरोपींवर देशद्रोहाचे कलमची वाढ करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास देखील केला आहे.
मात्र एनआयएच्या एफआयआरमध्ये देशद्रोहाचे दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बचाव पक्षाचे वकील ऍड. रोहन नहार आणि ऍड. शाहिद अख्तर यांनी देशद्रोहाचे कलम नसलेल्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
सुधीर प्रल्हाद ढवळे, शोमा सेन, महेश सिताराम, महेश सिताराम राऊत, रोना विल्सन, सुरेंद्र पुंडलिक गडलिंग, वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, अरूण फरेरा, वरनॉन गोन्सालविज आणि आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.