पुणे -“प्रथा जेव्हा सुरू झाली, त्यावेळची सामाजिक, नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती वेगळी होती. मात्र, काळानुरूप या सर्व परिस्थिती बदलत गेल्या. आज लोकसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित होत आहे. त्यामुळे आहे त्या संसाधनांच्या सुरक्षेसाठी प्रथांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे मत पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात आले आहे.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमी संघटनांकडून केले जात आहे. गणेशोत्सवातील काही प्रथांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने या प्रथा टाळाव्यात, अथवा त्यामध्ये पर्यावरणपूरक बदल करावेत, असे या संस्थांकडून सांगण्यात येत आहे. विशेषत: गणेशमूर्ती या शाडूच्या मातीच्या असाव्यात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे थेट नदीत अथावा जलाशयात विसर्जन करू नये, गणेशोत्सवात आरास करताना प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर टाळावा, गणेश विसर्जनादरम्यान निर्माण झालेले निर्माल्य नदीत फेकू नये, अशा गोष्टींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे नदीत विसर्जन, निर्माल्य थेट नदीत फेकल्याने होणारे नदीचे प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांबाबत आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हा प्रकार रोखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून त्यानुसार कृती करण्याची गरज आहे. त्याद्वारे भावी पिढीवरदेखील चांगले संस्कार घडतील.
– शैलजा देशपांडे, जीवितनदी संस्था