नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या पेचप्रसंगाचे संधीत रूपांतर केले जाऊ शकते. महामार्गाचे काम ठप्प झालेले काम स्थलांतरित मजुरांच्या मदतीने युद्धपातळीवर केले जाऊ शकते असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
विविध राज्यात 20 लाख स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. या मजूराचा उपयोग करून महामार्गाचे काम वेगाने वाढविले जाऊ शकते. याबाबत विविध राज्यांशी चर्चा चालू आहे. काम करताना संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची अर्थातच गरज आहे. यासंदर्भात मुख्य सचिव आणि जिल्हाधिकारी आवश्यक ते निर्णय घेऊ शकतात. ते म्हणाले की 20 लाख स्थलांतरित मजूर विविध छावण्यात आहेत. त्यांचा वापर या कामासाठी केला जाऊ शकतो. सध्या देशभरात काम ठप्प झाले आहे. त्यामुळे आगामी काळात जर पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला तर या अडचणीचे संधीत रुपांतर होऊ शकते.
त्यामुळे देशातील पायाभूत सुविधा विस्तारल्या जाऊ शकतात. या महामार्गाच्या लगत विविध कंपन्यांना आपले उद्योग उभारणे तुलनेने सोपे जाऊ शकते. परवानगी दिल्यानंतर आम्ही लगेच या विषयावर काम सुरू करू शकतो. त्याची मानसिक तयारी केलेली आहे असे गडकरी यांनी सांगितले. गेल्या आर्थिक वर्षात महामार्गाचे जेवढे काम झाले आहे, त्याच्या दुप्पट काम करण्याची आमची तयारी आहे. गेल्या वर्षी 3 हजार 979 किलोमीटर महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
छोट्या उद्योगाची भूमिका महत्वाची ठरणार
कोरोनामुळे लघु आणि मध्यम उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र यातून हा उद्योग बाहेर पडेल. चीनमध्ये निर्माण झालेल्या अभूतपूर्व प्रसंगामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची क्षमता छोट्या आणि मध्यम उद्योगात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यासाठी या उद्योगाला पुरेसे भांडवल आणि इतर बाबींचा पुरवठा करण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार विचार करीत असल्याचे गडकरी म्हणाले.