पुणे – सार्वजनिक, सरकारी क्षेत्रात लोकांना सेवा देणे हा हेतु असतो, खासगी क्षेत्रात केवळ नफा मिळवणे हा हेतु असतो. केंद्रातील मोदी सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दूरसंचार, बॅंका यांचे खासगीकरण करत आहे. खासगीकरणाचा अर्थ आहे की आपला देश आता सेवा या दृष्टिकोनातून नाही तर नफा हा हेतु ठेऊन वाटचाल करणार आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत सुरू असलेले आंदोलन सुद्धा खासंगीकरणाच्या विरोधातील आहे. खासगीकरण वेळीच रोखले नाही तर अर्थव्यवस्था कोलमडेल, बेकारी वाढेल, समाज विस्कळीत होईल यामुळे खासगीकरणा विरोधात चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार, कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने “भारतात मोदी सरकारची लोकशाही की खासगीशाही’ या विषयावर फेसबूक लाईव्हद्वारे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. खासदार अनिल देसाई यांनीही सहभाग घेतला. राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.
राज्यसभा खासदार अनिल देसाई म्हणाले, एअर इंडिया ही देशासाठी अभिमानाची गोष्ट होती. पण आज एअर इंडिया विकण्याची वेळ सरकारवर आली. ही कशामुळे? साठ हजार कोटीच कर्ज असणारी ही विमान कंपनी सरकारने केवळ 18 हजार कोटींना विकली. मग उरलेली कर्जाची रक्कम सरकार कशी भरणार आहे. याच काहीच गणित नाही, मग हे कस होणार? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होतात, ज्याची उत्तरे नाहीत. मात्र, एयर इंडिया टाटाकडे गेल्याने पुन्हा एकदा त्यांना गेलेले वैभव लाभेल, अशी अपेक्षा आहे.
स्मारक समितीचे ज्येष्ठ सदस्य व अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी आभार मानले.