मागणीसाठी उच्च न्यायालयाला पाठविणार पत्र – अॅड. वैशाली चांदणे
पुणे – कौटुंबिक न्यायालयाच्या न्याय क्षेत्राचा विस्तार झाला आहे. आता दाव्यांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवून आणखी दोन न्यायालय सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.
सध्या कौटुंबिक न्यायालयात पाच न्यायालये सुरु आहेत. प्रमुख न्यायाधीशपदी म्हणून सुभाष काफरे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. पाच न्यायाधीशांपैकी एका न्यायाधीशांची जागा रिक्त होती. या जागेवर नुकतेच न्यायाधीश आराध्ये यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे असोसिएशनतर्फे नुकतेच स्वागत करण्यात आले. उपलब्ध कोर्ट, न्यायाधीश संख्या सध्या पुरेशी आहे. मात्र, न्याय क्षेत्राचा वाढलेला विस्तार लक्षात घेऊन आणखी न्यायालये वाढविण्याची आवश्यकता भासणार आहे. वाढलेल्या न्याय क्षेत्राचा विचार केला तर रोज 30 हून अधिक दावे या क्षेत्रातून दाखल होऊ शकतात. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवून न्यायालयाची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे अॅड.. चांद्णे यांनी सांगितले.
नुकतीच पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या अकरा गावांचा समावेश कौटुंबिक न्यायालयात करण्यात आला आहे. लोहगाव, मुंढवा, हडपसर( संपूर्ण साडेसतरानळी), शिवणे ( संपूर्ण उत्तमनगर), शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रूक, फुरसुंगी, उरळी देवाची या गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.