नगर – आजच्या काळात अनेक बदल होत आहेत. त्यामुळे हे बदल स्वीकारण्याची गरज आहे. शिक्षकांमध्ये सध्या आत्मविश्वास गमावल्याचे दिसत आहे. ही परिस्थितीही बदलणे गरजेचे आहे. मी येत्या तीन वर्षात माझ्या मतादारसंघातील सर्व शाळा डिजीटल करणार आहे. अशाच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल करण्यासाठी प्रयत्न करावते, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर उपस्थित होते.
यावेळी मंत्री विखे यांच्या हस्ते सन 2020, 2021 आणि 2022 या तीन वर्षातील एकूण 46 शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विखे पुढे म्हणाले, की कोविड काळात शाळा बंद होत्या. त्यावेळी ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू होत्या. सुरुवातीला अडचणी आल्या. नंतर मात्र शिक्षकांनी हा बदल स्वीकारला.
शाळांतील पटसंख्या व खासगी शाळांचे आव्हान होते हे आव्हानही शिक्षकांनी स्वीकारले. शाळांची पटसंख्या वाढली. त्यामुळे काळानुसार होणारे बदल स्वीकारा, स्वतःला कमी लेखू नका असे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या पगारवाढीच्या मुद्द्यावर मंत्री विखे म्हणाले, की प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख असते. दुःख मानून चालत नाही. त्यामुळे आनंदी राहा प्रफुल्लित राहा असे म्हणत त्यांनी हा मुद्दा येथेच निकाली काढला.
पालकमंत्री बनलात तर जिल्हा नियोजनमधून निधी द्या
खासदार सुजय विखे म्हणाले, की तीन वर्षांनंतर शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होत आहे. विशेष म्हणजे, आम्ही सत्तेत आल्यानंतर मुहूर्त मिळाला याचा जास्त आनंद आहे. शाळांची पटसंख्या वाढायची असेल दर्जापेक्षा शाळांमध्ये जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील सोयी सुविधांवर सरकारने जास्त लक्ष देण्याची गरज आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जर जिल्ह्याचे पालकमंत्री बनले तर त्यांनी आधी शाळांचे संगणकीरकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून द्यावा, ही मागणी आताच करतो, असे खा. विखे यांनी सांगताच उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शिक्षकांची शाळा
<शिक्षकांनी मुख्यालयी राहायला पाहिजे. अशैक्षणिक कामांबाबत शिक्षकांची नेहमीच तक्रार असते. मात्र, सरकारकडे यंत्रणा नाही. अशैक्षणिक कामे शिक्षकांवर लादली गेलेली नाहीत. संघटनांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. ताण नाही फक्त कामकाजाचे प्राधान्यक्रम ठरवायला हवेत, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिक्षकांना सांगितले.
आमदारांनी फिरवली पाठ
-जिल्हा परिषदेच्या शिक्षक पुरस्कार वितरणास जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार होते. निमंत्रण पत्रिकेत या पाहुण्यांची नावेही छापण्यात आली होती. ते येतील असे वाटतही होते. प्रत्यक्षात मात्र बहुतांश लोकप्रतिनिधी इकडे फिरकले सुद्धा नाहीत.